दोन्ही देशांतील लोकांनाही क्रिकेटच हवे आहे- जावेद मियाँदाद

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट खेळलेच जायला हवे. क्रिकेट हा दोन्ही देशांना जोडणारा दुवा आहे आणि दोन्ही देशांतील लोकांनाही तेच हवे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 18:18 IST2019-03-03T18:17:13+5:302019-03-03T18:18:10+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
After the war, India's tourists had stayed in Pakistani's homes: Javed Miandad | दोन्ही देशांतील लोकांनाही क्रिकेटच हवे आहे- जावेद मियाँदाद

दोन्ही देशांतील लोकांनाही क्रिकेटच हवे आहे- जावेद मियाँदाद

कराची : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर खेळू नये, अशी भावना भारतवासियांच्या मनात आहे. पण पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांना मात्र असे वाटत नाही. कारण दोन्ही देशांतील तणावपूर्ण वातावरणाचा क्रिकेटवर परिणाम होता कामा नये, असे त्यांच्या म्हणणे आहे. हे सांगत असताना मियाँदाद यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्धानंतरची एक गोष्ट सांगितली आहे.

मियाँदाद याबाबत म्हणाले की, " भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट खेळलेच जायला हवे. कोणत्याही गोष्टीचा क्रिकेटवर परिणाम होता कामा नये. कारण क्रिकेट हा दोन्ही देशांना जोडणारा दुवा आहे आणि दोन्ही देशांतील लोकांनाही तेच हवे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1971 साली युद्ध झाले होते. त्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच 1978-79 साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी काही भारतीय पर्यटकही पाकिस्तानमध्ये आले होते. या पर्यटकांनी पाकिस्तानमध्ये हॉटेलमध्ये राहणे पसंत केने नाही, तर ते पाकिस्तानमधील नागरिकांच्या घरात राहिले होते. पाकिस्तानच्या नागरिकांनी भारतीयांचा चांगला पाहुणचारही केला होता. हे सारे क्रिकेटमुळेच घडले होते. त्यामुळे दोन्ही देशांतील क्रिकेट सुरुच राहायला हवे."


भारताला पाकिस्तानबरोबर खेळावेच लागेल, आयसीसीचे बीसीसीआयला स्पष्टीकरण
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये खेळू नये, अशी देशवासियांची भावना होती. त्यानंतर बीसीसीआयनेदेखील आम्ही पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये सरकारच्या परवानगीशिवाय खेळू शकत नाही, असे आयसीसीला कळवले होते. पण आता आयसीसीनेबीसीसीआयला याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

आयसीसीने याबाबत आपले मत मांडताना सांगितले की, " आयसीसी कोणत्याही देशावर बहिष्कार टाकू शकत नाही. कारण हे निर्णय सरकार घेऊ शकते. हे माहिती असतानाही बीसीसीआयने आम्हाला याबाबत विचारणा केली होती, पण हा निर्णय घेणे आमच्या हातामध्ये नाही."

... तर भारत वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्ध खेळणार नाही - बीसीसीआय
पाकिस्तानातून दहशतवाद्यांना मिळत असलेले सहकार्य आणि त्यामुळे भारतावर सतत होणारे हल्ले यामुळे शेजारील राष्ट्राविरोधात देशात संतापाचे वातावरण आहेच. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर त्या संतापात अधिक भर पडली. त्यामुळे पाकिस्तानला जशासतसे उत्तर देण्याची भाषा देशवासीय करत आहेत. पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका, मग ते राजकीय असो, आर्थिक असो किंवा खेळाच्या मैदानावरील असो. पाकला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ असल्याची भावना देशवासीयांत आहे. त्यामुळेच इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) पाकविरुद्ध सामन्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर तेथेही खेळण्याची गरज नाही अशी मागणी भारतात जोर धरत आहे. त्यावर बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की,'' वर्ल्ड कप स्पर्धा नजीक आल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. या प्रकरणात आयसीसी काहीच करू शकत नाही. भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, असे सरकारला वाटत असेल तर आम्ही सामन्यावर बहिष्कार घालू.''

Web Title: After the war, India's tourists had stayed in Pakistani's homes: Javed Miandad