England vs India, 1st Test Sai Sudharsan Debut : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाच्या पर्वात साई सुदर्शनच्या रुपात नव्या चेहऱ्याला टीम इंडियाकडून कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली. त्याच्याशिवाय करुण नायर याने ८ वर्षांनी कसोटी संघात कमबॅक केले आहे. इंग्लंडच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळताच युवा बॅटर साई सुदर्शन हा गांगुली-द्रविडच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. जाणून घेऊयात नव्या भिडूची एन्ट्री अन् दोन दिग्गजांसोबत जुळून आलेल्या कमालीच्या योगायोगासंदर्भातील खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
साई सुदर्शनला कसोटी पदार्पणाची संधी अन् कमालीचा योगायोग
आयपीएलमध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सच्या संघाकडून खास छाप सोडणाऱ्या साई सुदर्शन याला लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात पदार्पणाची संधी मिळाली. पुजाराने त्याला टेस्ट कॅप दिली. त्यामुळे २० जून २०२५ हा दिवस युवा खेळाडूसाठी एकमद खास आणि अविस्मरणीय ठरला. कमालीचा योगायोग हा की, कसोटी क्रिकेटमध्ये मोठे योगदान देणाऱ्या गांगुली-द्रविडनं देखील इंग्लंडच्या मैदानातून आणि २० जून रोजीच कसोटीत पदार्पण केले होते.
गांगुली-द्रविड जोडीनंही २० जूनलाच खेळला होता पदार्पणाचा कसोटी सामना
सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या दोन्ही दिग्गजांनी २० जून १९९६ मध्ये इंग्लंड दौऱ्यातूनच आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. या दोघांनी क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर पदार्पणाचा सामना खेळला होता. गांगुली हा पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणारा फलंदाजही ठरला होता. याशिवाय द्रविडनं ९५ धावांची खेळी केली होती.
१८ नंबर जर्सीतील कोहलीसाठीही २० जून ही तारीख खास
सौरव गांगुली आणि राहुल द्रविड शिवाय भारतीय संघातील महान क्रिकेटर अशी ओळख निर्माण करणाऱ्या विराट कोहलीनं देखील २० जून रोजीच कसोटीत पदार्पण केले होते. फरक फक्त एवढा की, तो आपला पहिला सामना हा वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता. किंग कोहलीनं २० जून २०११ रोजी किंग्स्टनच्या मैदानात कसोटीत पदार्पण केले होते. २० जूनला कसोटी पदार्पण करणाऱ्या या तिघांनी भारतीय क्रिकेटमध्ये आपली खास छाप सोडलीये. या तिघांप्रमाणे यश मिळवण्याची क्षमता साई सुदर्शन याच्याकडे आहे. तो ते साध्य करणार का? ते येणारा काळच ठरवेल.