भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये पहिला वहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. भारताच्या ५ बाद १५७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १५२ धावांत तंबूत परतला होता. अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी ७ धावांची गरज असताना MS Dhoni ने चेंडू जोगिंदर शर्माच्या ( Joginder Sharma ) हातात सोपवला अन् पठ्ठ्याने चतुराईने मिसबाह उल हकची विकेट घेत भारताला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. मिसबाहचा स्कूप मारण्याचा प्रयत्न फसला अन् फाईन लेगला उभ्या असलेल्या एस श्रीसंथने झेल टिपला. भारताने ५ धावांनी हा सामना जिंकून इतिहास घडविला.
या इतिहासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जोगिंदर शर्माने आज क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या त्या फायनलनंतर जोगिंदर भारताकडून केव्हाच ट्वेंटी-२० सामना खेळला नाही. २४ जानेवार २००७ मध्ये तो भारताकडून शेवटची वन डे खेळला होता. त्याने ४ वन डे सामन्यांत ३५ धावा केल्या व १ विकेट घेतली. तर ४ ट्वेंटी-२०त ४ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. आज निवृत्ती जाहीर करताना त्याने बीसीसीआय व टीम इंडियाचे आभार मानले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जोगींदरनं हरयाणा पोलीस जॉईन केले आणि तेथे तो पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहे. त्यामुळेच तो कोरोना काळात रस्त्यावर उतरून लोकांना समजावताना दिसला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"