Ind vs Ban, Day Night Test: टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; ठरले जगात लै भारी!

India vs Bangladesh Day Night Test Match: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या गुलाबी चेंडूवरील डे नाइट कसोटीत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 01:55 PM2019-11-24T13:55:42+5:302019-11-24T13:56:05+5:30

whatsapp join usJoin us
India vs Bangladesh Day Night Test Match: India have become the first team to complete four successive innings wins | Ind vs Ban, Day Night Test: टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; ठरले जगात लै भारी!

Ind vs Ban, Day Night Test: टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; ठरले जगात लै भारी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या गुलाबी चेंडूवरील डे नाइट कसोटीत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशवर डावानं विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघानं इतिहास घडवला. बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांत गुंडाळून भारतीय संघाने याही मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. या विजयासह टीम इंडियानं कोणत्याही संघाला न जमलेली कामगिरी करून स्वतःला लै भारी ठरवलं.

बांगलादेशच्या पहिल्या डावातील 106 धावांच्या उत्तरात भारताच्या सलामीवीरांना अपयश आलं. मयांक अग्रवाल ( 14) आणि रोहित शर्मा ( 21) छोटेखानी खेळी केली. पण, चेतेश्वर पुजारा व विराट कोहलीनं संघाचा डाव सावरला. पुजाराला ( 55 धावा) इबादत होसैननं माघारी पाठवलं. अजिंक्य रहाणेनं 69 चेंडूंत 7 चौकार मारताना 51 धावा केल्या. कोहलीनं 194 चेंडूंत 18 चौकारांसह 136 धावा केल्या. कोहली माघारी परतल्यानंतर भारताचे तळाचे फलंदाज झटपट माघारी परतले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. भारताचे 5 फलंदाज 58 धावांत माघारी परतले. भारतानं 9 बाद 347 धावांवर डाव घोषित केला.   

बांगलादेशला दुसऱ्या डावातही साजेशी कामगिरी करता आली नाही. इशांत शर्मानं पहिल्याच षटकात शदमान इस्लामला ( 0) पायचीत केले. त्यानंतर इशांतनं बांगलादेशला आणखी दोन धक्के दिले. इम्रुल कायस ( 5) आणि कर्णधार मोमिनूल हक ( 0) यांनाही तंबूत पाठवले. उमेश यादवनं बांगलादेशला चौथा धक्का देताना मोहम्मद मिथूनला (6) बाद केले. बांगलादेशची अवस्था 4 बाद 13 अशी दयनीय झाली होती, परंतु त्यानंतर मुश्फीकर रहीम व महमुदुल्लाहनं डाव सावरला. पण, महमुदुल्लाहला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रहीम आणि मेहीदी हसन मिराझ या जोडीनंही अर्धशतकी भागीदारी केली. इशांत शर्मानं मेहीदीला माघारी पाठवून बांगलादेशला पाचवा धक्का दिला. त्यानंतर बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजांनी निराश केलं. बांगलादेशनं दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 152 धावा केल्या.

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात बांगलादेशला धक्का दिला. उमेश यादवनं भारताला मोठं यश मिळवून दिलं. त्यानं तिसऱ्या दिवसाची दुसरी विकेट घेताना बांगलादेशच्या मुश्फिकर रहीमला तंबूत पाठवले. रहीम एका बाजूनं नांगर रोवून बांगलादेशसाठी खिंड लढवत होता. रहीम 96 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीनं 74 धावा करून माघारी परतला. भारतानं बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांत गुंडाळून एक डाव व 46 धावांनी विजय मिळवला. उमेश यादवनं 5,तर इशांत शर्मानं चार विकेट्स घेतल्या. 

भारतीय संघानं बांगलादेशवर पहिल्या कसोटीत एक डाव व 130 धावांनी विजय मिळवला होता. तत्पूर्वी टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 2-0 असा विजय मिळवला. भारतानं हे दोन्ही सामना डावाच्या फरकानं जिंकले. भारतानं पहिली कसोटी एक डाव व 137 धावांनी, तर दुसरी कसोटी एक डाव व 202 धावांनी जिंकली. डावाच्या फरकानं सलग चार कसोटी सामने जिंकणारा भारत हा जगातला पहिलाच संघ ठरला, तर विराट कोहली हा पहिला कर्णधार ठरला. 
 

Web Title: India vs Bangladesh Day Night Test Match: India have become the first team to complete four successive innings wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.