India Won The First ODI In Ranchi By 17 Runs Against South Africa : विराट कोहलीचे वनडेतील विक्रमी शतक रोहित शर्मा आणि कार्यवाहू कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजीत कुलदीप यावदसह हर्षित राणाने दाखवली धमक याच्या जोरावर भारतीय संघाने रांचीचं मैदान मारलं आहे. पहिल्या वनडेतील दिमाखदार विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. रांचीच्या मैदानात टॉस महत्त्वपूर्ण होता. हा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं लागला होता. पण टॉस गमावल्यानंतर बॅटिंगसह बॉलिंगमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवत टीम इंडियाने अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात बाजी मारली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोहलीच्या विक्रमी सेंच्युरीसह फलंदाजीत रोहित अन् केएल राहुलचं दमदार अर्धशतक
लोकेश राहुलनं टॉस गमावल्यामुळे भारतीय संघावर या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आली. यशस्वी जैस्वाल स्वस्तात माघारी फिरल्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीची दमदार खेळी त्यानंतर लोकेश राहुलसह रवींद्र जडेजाने फलंदाजीत केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद ३४९ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर ३५० धावांचे टार्गेट सेट केले होते.
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
हर्षित राणाचा भेदक मारा अन् मोक्याच्या क्षणी कुलदीपच्या फिरकीतही दिसली जादू
भारतीय संघानं ठेवलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी आघाडीच्या फलंदाजीला सुरुंग लावला. हर्षित राणाने यात पुढाकार घेतला. नव्या चेंडूवर त्याने तीन विकेट्स घेत टॉस गमावलेल्या मॅचमध्ये टीम इंडियाला फ्रंटफूटवर आणले. अर्धा संघ तंबूत परतल्यावर मार्को यान्सेन आणि मॅथ्यू ब्रीट्झके या जोडीनं सामन्यात ट्विस्ट आणला. पण कुलदीपनं या दोघांचा खेळ खल्लास करत भारतीय संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. मैदानात दव असल्यामुळे गोलंदाजी करणं मुश्किल होते. याचा फायदा घेत सेट झालेला कॉर्बिन बॉशही मॅच दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं वळवू शकला असता. पण अर्शदीप सिंगनं ४९ व्या षटकात अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी आणि अखेरच्या षटकात प्रसिद्ध कृष्णानं घेतलेल्या विकेटसह भारतीय संघाने पहिल्या विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी मिळवण्याचा डाव अगदी यशस्वीपणे साधला.
दक्षिण आफ्रिकेकडून तिघांची अर्धशतके, पण...
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून तिघांनी अर्धशतक झळकावले. मार्को यान्सेन याने ३९ चेंडूत केलेल्या ७० धावांच्या खेळीसह मॅथ्यू ब्रीट्झके याने ८० चेंडूत ७२ धावांच्या खेळीसह संघाला सामन्यात आणले. ही दोघे माघारी फिरल्यावर कॉर्बिन बॉश याने एकाकी किल्ला लढवत ५१ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. त्याने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो कमी पडला. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. हर्षित राणा याने ३ आणि अर्शदिप सिंगनं २ तर प्रसिद्ध कृष्णानं एक विकेट आपल्या खात्यात जमा केल्या.