वंचितच्या उमेदवाराचा पराभव, भाजप आमदाराद्वारे ईव्हीएममध्ये गडबडीचा आरोप; प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 14:12 IST2026-01-17T14:11:29+5:302026-01-17T14:12:31+5:30
आमदार नारायण कुचे यांच्या घराच्या दिशेने जाण्याचा आंदोलकांचा प्रयत्न, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

वंचितच्या उमेदवाराचा पराभव, भाजप आमदाराद्वारे ईव्हीएममध्ये गडबडीचा आरोप; प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर : वंचितचे उमेदवार सतीश गायकवाड यांचा शेवटच्या फेऱ्यांमध्ये ७६९ मतांनी पराभव झाला. आमदार नारायण कुचे यांच्या हस्तक्षेपानंतर ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केल्याचा आरोप गायकवाड यांनी करत निकालावर आक्षेप घेतला. यानंतर हजारो समर्थकांनी मतमोजणी केंद्रात घुसून प्रवेशद्वारावरच ठिय्या देत घोषणाबाजी केल्याने तासभर मतमोजणी केंद्राचा प्रवेश बंद करावा लागला.
सतीश गायकवाड हे प्रभाग २४ (अ) मधून वंचितचे उमेदवार होते. गरवारे आयटी पार्क मतमोजणी केंद्रात दुपारी ३:३० वाजेनंतर अंतिम टप्प्यातील मतमोजणीत गंगाबाई भवरे ७३७३ मत मिळवून विजयी झाल्या. गायकवाड यांना ६६०४ मते मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी घोषित केले. मात्र, कुचे यांच्या सूचनेवरून ईव्हीएम मशीन बदलून गडबड करण्यात आल्याचा आरोप करत गायकवाड यांनी करीत पुनर्मोजणीची मागणी केली. ही मागणी अमान्य झाल्याने सुरक्षा जाळीवर चढून गायकवाड यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षेत उडी मारली आणि केंद्रात गोंधळ उडाला. भवरे यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करताना गायकवाड यांनी आक्षेप घेतल्याने तणाव वाढला होता.
हजारो समर्थक मतमोजणी केंद्रात घुसले
ही वार्ता कळताच गायकवाड यांचे हजारो समर्थक केंद्राबाहेर दाखल झाले. पोलिसांनी मज्जाव करूनही संतप्त जमावाने आत प्रवेश केला. यावेळी चांगलीच धक्काबुक्की झाली. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी तासभर ठिय्या दिल्याने मतमोजणी केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करावे लागले. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी जमावाला शांत राहण्यासाठी आव्हान केले. मात्र, जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. तणाव वाढल्याने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनास्थळी येत समजावण्याचा प्रयत्न केला.
सौम्य लाठीचार्ज, परिस्थिती नियंत्रणात
गायकवाड यांनी स्वत: केंद्राबाहेर येत शांततेचे आव्हान केल्याने हजारोंचा जमाव कलाग्राममार्गे पायीच संघर्षनगरच्या दिशेने निघाला. यावेळी आमदार कुचे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. जवळपास २ ते ३ हजारांच्या जमावामुळे जालना रोडची एक बाजू खोळंबली होती. त्यातच काही तरुणांनी मुकुंदवाडी गावाच्या दिशेने जात कुचे यांच्या घराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच सौम्य लाठीचार्ज केल्याने त्यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर संघर्षनगरमध्ये मोर्चा नेण्यात आला. आपला नगरसेवक, मनातला नगरसेवक असे फलक लावण्यात आले. त्यानंतर गायकवाड यांनी शांततेचे आव्हान करून समर्थकांना संबोधित केले. निकालाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची घोषणा गायकवाड यांनी केल्यानंतर तणाव निवळला. मात्र, या घटनेमुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.