देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांना उत्तर द्यावं लागेल: शरद पवार
By स. सो. खंडाळकर | Published: April 20, 2024 01:59 PM2024-04-20T13:59:23+5:302024-04-20T14:00:12+5:30
देशात लोकांना बदल पाहिजे, असं लक्षात येतंय; शरद पवार यांचे भाकीत
![Country moving towards dictatorship, we have to give answer: Sharad Pawar | देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांना उत्तर द्यावं लागेल: शरद पवार Country moving towards dictatorship, we have to give answer: Sharad Pawar | देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांना उत्तर द्यावं लागेल: शरद पवार](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/sharad-pawar-abd-ncp-lok-at_2024041215772.png)
देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांना उत्तर द्यावं लागेल: शरद पवार
छत्रपती संभाजीनगर: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रभावी कार्यक्रम करीत होते. मात्र, केंद्र सरकारवार टिका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. सध्या देशाची वाटचाल हुकुमशाही कडे चालू आहे. ही हुकूमशाही आपली लोकशाही उद्धवस्थ करेल, त्याला उत्तर द्यावं लागेल, असा निर्धार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते आज दुपारी १ वाजता छत्रपती संभाजीनगरात सभेत बोलत होते.
महाविकास आघाडीकडून औरंगाबाद लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खैरे यांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची सभा श्रीहरी पव्हेलियन येथे आयोजित करण्यात आली होती. दुपारी एक वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेस संबोधित केले. पवार म्हणाले, इंडिया आघाडीस अनेक पक्ष साथ देत आहेत. आम्ही सर्व पक्ष मिळून या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत. देशात लोकांना बदल पाहिजे, असं लक्षात येतंय. त्यामुळेच औरंगाबादेतचंद्रकांत खैरे आणि जालना लोकसभेसाठी डॉ. कल्याण काळे या दोघांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
.. ते फक्त टीका करण्यात वेळ घालतात
मोदी हे देशाचे नव्हे तर केवळ भाजपचे आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रीय दृष्टिकोण नाही. तुम्ही देशासाठी काय करणार हे सांगितलं पाहिजे. मात्र ते सतत टिका करण्यात वेळ घालवत आहेत. माजी प्रधानमंत्री पंडित नेहरुंवर टिका करणाऱ्या पंतप्रधानांची मानसिकता ओळखा. यांना महागाई कमी करता आली नाही, अशी टीका देखील पवार यांनी केली.
भाजपाकडून सत्तेचा गैरवापर
एका सर्वेक्षणानुसार देशात शाळां-महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या मुलांच्या बेकारीचं प्रमाण ८७ टक्के आहे. आज शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. राज्यातील फळबागा जळून खाक होत आहेत. मात्र, सरकार याकडे ढुंकून पाहत नाही. त्यांना चिंता नाही. मग सत्तेचा हे लोक गैरवापर करीत आहेत, असा आरोपही पवार यांनी केंद्र सरकारवर केला.