विदर्भात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू; तिघे होरपळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 10:59 IST2022-09-29T10:58:33+5:302022-09-29T10:59:36+5:30

मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश

Five killed by lightning strike in Vidarbha; The three were burnt | विदर्भात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू; तिघे होरपळले

विदर्भात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू; तिघे होरपळले

चंद्रपूर/ यवतमाळ :यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाला. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. तर, होरपळल्याने तिघे जखमी झाले.

चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील पाटण, चिखली परिसरात बुधवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. यात वीज पडून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. ही घटना चिखलीपासून काही अंतरावर घडली.

वंदना चंदू कोटनाके (३५) व भारुला अनिल कोरांगे (३२) दोघेही रा.चिखली अशी मृत महिलांची नावे आहेत. यात वंदना कोटनाके यांचा एक मुलगा, एक मुलगी आणि भारुला कोरांगे यांचा मुलगाही जखमी झाला आहे. यात सुरेखा जागेराव वेडमे ही महिलाही जखमी झाली आहे. जखमींना पाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले आहे. जिवती तालुक्यातीलच मराई पाटण येथील चंद्रकांत टोपे (४६) शेतात काम करत असताना वीज कोसळल्याने ठार झाले. दरम्यान, भद्रावती तालुक्यातील राळेगाव शिवारात वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याचीही घटना बुधवारी दुपारी घडली.

यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी महिला ठार

यवतमाळ तालुक्यातील वडनेर येथे वीज कोसळून गीता माणिक राठोड (४०) या महिलेचा मृत्यू झाला. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पाऊस सुरू झाल्याने त्या शेतातील गोठ्यात थांबल्या होत्या. त्याच वेळी वीज कोसळून त्या ठार झाल्या. दुसरी घटना झरीजामणी तालुक्यातील कारेगाव शिवारात दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. लखू रामू धुर्वे (४०) असे मृताचे नाव आहे. ते बैल चारण्यासाठी शेतात गेले होते. अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Five killed by lightning strike in Vidarbha; The three were burnt