GenZ Workers: भारतातील तरुण कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी वारंवार बदलण्याचा (जॉब-हॉपिंग) ट्रेंड झपाट्याने वाढतोय. Quess Corp च्या अहवालानुसार, Gen Z कर्मचाऱ्यांचा एका कंपनीत टिकण्याचा कालावधी सरासरी २४ महिन्यांपेक्षा कमी झाला आहे. यामुळे कंपन्यांना नव्या पदांपेक्षा रिक्त झालेल्या जागा भरण्यावरच अधिक भर द्यावा लागत आहे.
४०% भरती फक्त रिप्लेसमेंटसाठी
अहवालानुसार, कंपन्यांमधील एकूण भरतींपैकी तब्बल ४०% भरती या नवीन पदांसाठी नसून, नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्यासाठी होत आहेत. म्हणजेच, प्रत्येक ५ भरतींपैकी २ भरती या रिप्लेसमेंट स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे कंपन्यांमध्ये सतत भरती, प्रशिक्षण आणि पुन्हा भरती असे अखंड चक्र सुरू असल्याचे चित्र आहे.
GCC मध्ये ‘वाढती भरती’ अन् ‘वाढती रिक्तता’...
भारतामध्ये कार्यरत असलेल्या ग्लोबल कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये, म्हणजेच Global Capability Centres (GCC) एक वेगळीच स्थिती दिसून येत आहे. एका बाजूला नव्या भरतींमध्ये वेगाने वाढ होत असताना, दुसऱ्या बाजूला तरुण कर्मचारी लवकर नोकरी सोडत असल्याने कंपन्या जुन्याच पदांवर पुन्हा भरती करत आहेत.
लवकर नोकरी का बदलतात तरुण?
लवकर नोकरी बदलण्याचा ट्रेंड टेक क्षेत्रात जास्त पाहायला मिळतोय. जास्त पगार, प्रमोशन आणि आधुनिक तंत्रज्ञानावर, विशेषतः Artificial Intelligence वर काम करण्याच्या संधींसाठी तरुण कर्मचारी पटापट नोकऱ्या बदलत आहेत. यामुळे कंपन्यांसाठी कर्मचारी टिकवून ठेवणे मोठे आव्हान बनले आहे.
भरतीत मोठी वाढ
अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२६ च्या मार्च तिमाहीत GCC मधील भरतीत लक्षणीय वाढ झाली आहे. मागील तिमाहीतील ४-६% वाढीच्या तुलनेत यावेळी १२-१४% वाढ नोंदवली गेली आहे. यावरून उद्योगक्षेत्रात भरतीची गती वाढत असल्याचे स्पष्ट होते.
भविष्यात २७ लाख रोजगारांची शक्यता
सध्या भारतात अंदाजे २,१५० ते २,२०० सक्रिय GCC कार्यरत आहेत. २०३० पर्यंत या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या २५ ते २७ लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. विशेषतः AI, डेटा आणि प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग या कौशल्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असून, एकूण मागणीपैकी सुमारे ६०% हिस्सा या क्षेत्रांशी संबंधित आहे.
