नवी दिल्ली - भारत सरकारकडून आत्मनिर्भरतेच्या वारंवार योजना आणल्या जात असल्या तरी, भारतीय उद्योग जगतावर चीनची पकड अधिक घट्ट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
देशातील एकूण औद्योगिक मालाच्या पुरवठ्यापैकी तब्बल ३०.८ टक्के पुरवठा एकट्या चीनकडून होत असून, हे अतिअवलंबित्व भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक असल्याचे जीटीआरआयने आपल्या अहवालात म्हटले आहे.
आयातीचा आकडा गगनाला
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताची एकूण आयात ७७४.९८ अब्ज डॉलरवर पोहोचली, त्यापैकी १३१.६३ अब्ज डॉलरचा माल केवळ चीनमधून मागविण्यात आला आहे. भारताच्या एकूण आयातीमध्ये चीनचा वाटा १५-१६ टक्के असला तरी, उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या बाबतीत चीनचा दबदबा प्रचंड आहे.
भारतासमोर काय पर्याय?
विविधता आणणे गरजेचे, आपली ‘सप्लाय चेन’ अजूनही चीनशी जोडलेली आहे. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताला प्रमुख क्षेत्रांमध्ये देशांतर्गत क्षमता निर्माण करावी लागेल. केवळ ‘मेक इन इंडिया’वर भर देऊन चालणार नाही, तर पुरवठा साखळीत विविधता आणणे आता काळाची गरज बनली आहे.
मुक्त व्यापार करारामुळे गुंतवणुकीला चालना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ‘मुक्त व्यापार करारामुळे भारताच्या निर्यातीला मोठा वेग मिळणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या कराराचे वर्णन ‘ऐतिहासिक मैलाचा दगड’ असे केले. यामुळे देशात नव्या संधी खुल्या होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
