Minimum Balance Penalty: बँकेत मिनिमम बॅलेन्स मेंटेन केले नाही, तर बँक तुमच्याकडून पेनल्टी आकारते. याच दंडातून भारतीय बँकांनी गेल्या तीन वर्षांत तब्बल १९,०८३ कोटी रुपये मिळवल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा पाहून, लहान-लहान शुल्कांच्या स्वरूपात वसूल होणारी ही रक्कम ग्राहकांच्या खिशावर मोठा आर्थिक भार टाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्राहकांवरील वाढता आर्थिक ताण
दरम्यान, चार्टर्ड अकाउंटंट कनन बहल यांनी LinkedIn वर पोस्ट करत या दंडाबाबत चिंता व्यक्त केली. आर्थिक अडचणीत असलेल्या ग्राहकांकडून अशा प्रकारे दंड वसूल करणे योग्य नाही, असे त्यांचे मत आहे.
प्रायव्हेट बँका दंडवसुलीत आघाडीवर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, खासगी बँकांनी या दंडातून सर्वाधिक कमाई केली आहे. HDFC Bank सहित प्रायव्हेट बँकांनी गेल्या तीन वर्षांत सुमारे १०,९९१ कोटी रुपये वसूल केले, जे एकूण रकमेच्या निम्म्याहून अधिक आहे. दुसरीकडे, सरकारी बँकांनीही ८,०९२ कोटी रुपये दंडाच्या स्वरूपात जमा केले आहेत. यावरून सार्वजनिक आणि खासगी दोन्ही क्षेत्रातील बँकांसाठी हा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असल्याचे दिसते.
‘HDFC Bank’ अव्वल, इतर बँकाही मागे नाहीत
बँकांच्या आकडेवारीत HDFC Bank अव्वल ठरली असून, या बँकेने एकट्यानेच सुमारे ३,८७१ कोटी रुपये दंडातून कमावले आहेत. त्यानंतर Axis Bank, ICICI Bank आणि Bank of Baroda यांनीही प्रत्येकी १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.
काही बँकांकडून दिलासा
दरम्यान, State Bank of India (SBI) आणि Punjab National Bank (PNB) यांनी सध्या मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास कोणताही दंड आकारला जात नाही. मात्र, पूर्वीच्या काळात या बँकांनीही अशा शुल्कातून मोठी कमाई केली होती. त्यामुळे त्या काळात हा दंड त्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग होता, हे स्पष्ट होते.
