दहशत असती तर, एवढ्या महिला आल्या असत्या का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 23:44 IST2019-10-11T23:43:36+5:302019-10-11T23:44:49+5:30
दहशत असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला या मेळाव्याला आल्या असत्या का ? असा सवाल करीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे म्हणाल्या, साहेबांनी दीड हजाराच्या जवळपास मुलींचे कन्यादान करायचं काम केलं. आपण एकदा परिवर्तन करा अन् त्यांना निवडून द्या, असे आवाहन राजश्री मुंडे यांनी केले.

दहशत असती तर, एवढ्या महिला आल्या असत्या का ?
परळी : परळीमध्ये कसली आली आहे दहशत? धनंजय मुंडे या तुमच्या भावाचे सुरक्षा कवच असल्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. दहशत असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला या मेळाव्याला आल्या असत्या का ? असा सवाल करीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे म्हणाल्या, साहेबांनी दीड हजाराच्या जवळपास मुलींचे कन्यादान करायचं काम केलं. आपण एकदा परिवर्तन करा अन् त्यांना निवडून द्या, असे आवाहन राजश्री मुंडे यांनी केले.
धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ शहरातील हालगे गार्डन येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मला माझ्या मुली म्हणाल्या की, आई, बाबा इथल्या नागरिकांसाठी खूप काही करतात. २४-२४ तास नागरिकांमध्ये असतात. तू एक पाऊल पुढं टाक अन महिलांसाठी काम कर. त्यानंतर मी आता हे काम सुरू केलं आहे. इतिहास साक्षी आहे. एकदा महिलांनी परिवर्तनाची लढाई हातात घेतली की, परिवर्तन अटळ आहे आणि ते आम्ही करणार असे राजश्री मुंडे म्हणाल्या.
सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम
धनंजय मुंडेनी विकासाचं राजकारण केलं आहे. तुमचे भाऊ सरकारला भांडून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करतात. पीकविमा, वैद्यनाथचे बिल हे आंदोलन करून मिळवून दिले आहेत. दोनदा आमदार, दोनदा खासदार म्हणून निवडून आल्या तरी दुष्काळात परळीकरांना पाण्याचा एक हंडा देखील दिला नाही. ज्या वैद्यनाथ कारखान्याचे नाव आशिया खंडात होतं तो वैद्यनाथ कारखाना बंद पाडण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी केलं आहे असा घणाघात करत भावजई राजश्री धनंजय मुंडे यांनी नणंद पंकजा मुंडेंसह प्रीतम मुंडेंवर निशाणा साधला.