तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही :पंकजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 23:56 IST2019-10-19T23:56:36+5:302019-10-19T23:56:49+5:30
माझी गुणवत्ता जनता ठरवेल, तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही. खोटेनाटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु, जनतेला खरेखोटे माहीत असल्यामुळे, अशा अफवांवर, आरोपावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, असे प्रतिपादन भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले.

तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही :पंकजा
परळी : माझी गुणवत्ता जनता ठरवेल, तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही. खोटेनाटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु, जनतेला खरेखोटे माहीत असल्यामुळे, अशा अफवांवर, आरोपावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, असे प्रतिपादन भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले. प्रचाराच्या समारोपाची सभा राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की बोलताना सुसंस्कृतपणा असला पाहिजे, नात्यागोत्याचा सन्मान केला पाहिजे, असे म्हणत पंकजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. हीन पातळीच्या राजकारणावरही त्यांनी कडक शब्दांत टीका केली.
यावेळी भाषण करताना पंकजा मुंडे अतिशय भावनिक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, सध्या राजकारणाची पातळी अतिशय हीन झाली आहे. हे सर्व पाहून मनात राजकारण सोडण्याचाही विचार आला होता पण लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब यांचे समाजकार्य मला पुढे न्यायचे आहे. त्यांनी माझ्या स्वाधीन केलेल्या जनतेला वाऱ्यावर सोडू शकत नाही. माझी लढाई ही व्यक्ती विरोधात नसुन वृत्ती विरोधात आहे मात्र राष्ट्रवादीने ही लढाई केवळ माझ्याविरुद्ध लढली आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी डॉ. अमित पालवे, खा.डॉ प्रितम मुंडे, यश:श्री मुंडे, प्रा. टी पी मुंडे, माजी आमदार हरिभाऊ राठोड, राजेश देशमुख, जुगलिकशोर लोहिया, शिवाजीराव गुट्टे, अशोक जैन, विनोद सामत, शालिनी कराड, दत्ताप्पा इटके, विकासराव डूबे, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
परळी विकासासाठी वचनबद्ध
मी सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करीत आहे.
परळीच्या विकासासाठी मी वचनबद्ध आहे. कुटुंबापेक्षाही जास्त वेळ जनतेसाठी देते तरीही
माझ्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो असे पंकजा मुंडे यांंनी सांगितले.