जलसाक्षरता मोहीम जोरात; अमरावती जिल्ह्यात ९४३ घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग
By गणेश वासनिक | Updated: September 7, 2024 14:26 IST2024-09-07T14:26:06+5:302024-09-07T14:26:34+5:30
Amravati : भूगर्भात पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ, जिल्ह्यातील सात तालुक्यांत यशस्वी प्रयोग

Water literacy campaign in full swing; Rain water harvesting in 943 houses in Amravati district
अमरावती : जलसाक्षरता मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येत असून गत दोन वर्षांत सात तालुक्यांतील ९४३ घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम यशस्वीपणे कार्यरत आहे. परिणामी सात तालुक्यांत भूगर्भात पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे.
पाणी हे जीवन आहे, त्याला विनाशापासून वाचविण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. पर्यावरणातील बदलते चक्र, वाढते तापमान, बेजबाबदार दिनचर्यांमुळे मानवी जीवनातील समाजामध्ये पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. आज आम्ही प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी बघतो. येणारी पिढी कदाचित छोट्याशा कॅप्सूलमध्ये पाणी बघेल. या परिस्थितीला जनसामान्यात पाण्याप्रति असलेली निरक्षरता जबाबदार आहे. निसर्गाच्या ऋतुचक्रात जितक्याही प्रमाणात पाऊस आपल्या क्षेत्रात पडतो त्याचा थेंब न थेंब जमिनीत मुरविल्यास भविष्यात पाणीटंचाई, दुष्काळ यासारख्या संकटांपासून आपण वाचू शकतो या उद्देशाने जलदूत अश्विनसिंह गौतम यांनी सन २०२२ पासून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, तिवसा, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे, भातकुली, वरुड, तालुक्यातील तब्बल ६२१ गावांमध्ये जलसाक्षरता अभियान राबविले.
पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम घरी तयार करण्याचे आवाहन जलसाक्षरता उपक्रमाद्वारे करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील घरांमध्ये ग्रामवासीयांनी स्वखर्चाने एकूण ९४३ रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम उभी केली. पावसाचे पाणी नाहक वाहून न जाता सरळ जमिनीत मुरतेय. यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग लावलेल्या परिसरात भूजल पातळी वाढली असल्याचे विहिरी आणि बोअरवेलच्या माध्यमाने समजून आले. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम भूजल पातळी वाढविण्यास प्रभावी निकाल देत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडत असला तरी उन्हाळ्यात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. या समस्येला रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम कमी खर्चाचे आणि प्रभावी उपाय आहे.
"जल है तो जीवन है, हे वास्तव आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरविल्याशिवाय दुष्काळ, जलसंकटावर मात करता येणार नाही. त्यामुळे महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतींनी नागरिकांना घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करणे आवश्यक आहे."
- ॲड. किशोर शेळके, माजी महापौर