अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 15:28 IST2024-11-23T15:26:03+5:302024-11-23T15:28:28+5:30
Assembly Election 2024 Result Live Updates : अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
Assembly Election 2024 Result Live Updates : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. दुपारी ३ वाजेपर्यंतच्या मतमोजणीनुसार महायुतीने जोरदार मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपला १३०, शिवसेनाला ५५, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४० जागांवर आघाडी मिळाली आहे. तर महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट होताना दिसत आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व दिसून आले आहे, महाविकास आघाडीचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले असून अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. नगर शहर विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, येथून अजित पवार गटाचे संग्राम भैय्या जगताप यांनी विजय मिळवला आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या राहाता मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झाले आहेत. या ठिकाणी त्यांना प्रभावती घोगरे यांनी चांगलीच लढत दिली.
एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या संगमनेर विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून गेल्या चार दशकांपासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवणार्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना यावेळी पराभवाचा धक्का बसला आहे. महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे (शिवसेना शिंदे गट) ४०२१ मतांनी विजयी. महाविकास आघाडीचे उमेदवार शंकराव गडाख (शिवसेना ठाकरे) यांचा पराभव. बाळासाहेब मुरकुटे यांच्यानंतर लंघे ठरले जायंट किलर.
विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचं चित्र होणार स्पष्ट
अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात सत्ता बदल होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यावेळी २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी राज्यात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे.