हृदयद्रावक! रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 17:50 IST2023-03-24T17:49:38+5:302023-03-24T17:50:14+5:30

 रेल्वे रूळ ओलांडताना विरार रेल्वे स्थानकावर एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

Three members of the same family died at Virar railway station while crossing railway tracks | हृदयद्रावक! रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू 

हृदयद्रावक! रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू 

(मंगेश कराळे)

नालासोपारा : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करताना अपघात घडला आहे. यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री बारा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे.

वसई विरारमध्ये रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करण्याचे सत्र सुरूच आहे. यामुळे येणाऱ्या गाड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. गुरुवारी रात्री वस‌ईतील पटेल कुटुंबीय सुरतवरुन घरी परतत होते. रात्री १२ वाजुन २० मिनिटांच्या सुमारास विरारच्या फलाट क्रमांक पाच वरून चारवर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करीत होते. याच दरम्यान फलाट क्रमांक चार वरून येणाऱ्या वेरावळ एक्सप्रेसची जोराची धडक बसली. यात पती पत्नी व मुलगा अशा तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पटेल कुटुंबीय मुळचे जौनपुर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. अजितकुमार पटेल (२८), सीमादेवी पटेल (२६), आर्यन पटेल (३ महिने) अशी मृतांची नावे आहेत. रेल्वे पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले आहेत. याप्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी दिली आहे.

रेल्वे रूळ ओलांडणे हे केवळ बेकायदा नव्हे तर अधिक  धोकादायक आहे. परंतु लवकर जाण्यासाठी, जिने चढउतार करण्याचा कंटाळा अशा प्रकारामुळे अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असतात. यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करू नये असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

 

Web Title: Three members of the same family died at Virar railway station while crossing railway tracks