भटक्या कुत्र्याचं नख लागल्याने रेबिज; सहा महिन्यांनंतर चिमुकलीचा मृत्यू, जखम भरत गेली पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 05:20 IST2026-03-25T05:20:42+5:302026-03-25T05:20:42+5:30
या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भटक्या कुत्र्याचं नख लागल्याने रेबिज; सहा महिन्यांनंतर चिमुकलीचा मृत्यू, जखम भरत गेली पण...
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : भटक्या श्वानाच्या नखाने एका चिमुरडीच्या हाताला जखम झाली. मात्र ती घाबरल्याने त्या जखमेवर इंजेक्शन देता आले नाही. नंतर हळूहळू ती जखम भरत गेल्याने त्याकडे कुटुंबीयांचेही दुर्लक्ष झाले. मात्र याच दरम्यान तिला रेबिजची लागण झाली आणि साधारण सहा महिन्यांनंतर सोमवारी त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
कशिश सहानी असे या मुलीचे नाव असून, ती नालासोपारा पश्चिमेतील सुबोध सागर इमारतीत आपल्या कुटुंबासोबत राहत होती. ती मदर मेरी शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी आजोबांसोबत जात असताना एका भटक्या श्वानाच्या नखाने तिच्या हाताला जखम झाली. दुसऱ्या दिवशी तिला उपचारासाठी नेले होते, मात्र इंजेक्शनच्या भीतीमुळे ती अस्वस्थ झाली आणि उपचार पूर्ण होऊ शकले नाहीत.
जखम लवकर भरल्याने पुढे त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती खालावली. अन्न-पाणी घेणे बंद झाले, डोळ्यांमध्ये लालसरपणा दिसू लागला. परिस्थिती गंभीर होताच कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविले; पण डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिचे प्राण वाचू शकले नाही. वैद्यकीय अहवालात रेबिज संसर्गाने मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.
परिसरातील नागरिकांची तपासणी; पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क
या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत प्रशासनाकडे गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. आगामी मनपा सभेतही हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागानेही सतर्कता दाखवत संबंधित मुलीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करणार असल्याचे म्हटले आहे.
त्वरित उपचार घेणे अत्यावश्यक
श्वान किंवा मांजर चावणे अथवा नख लागणे ही बाब अजिबात दुर्लक्षित करू नये. त्वरित उपचार घेणे अत्यावश्यक आहे.
विशेषतः लहान मुलांना इंजेक्शनची भीती वाटते, त्यामुळे ते अनेकदा अशा गोष्टी लपवतात.
अशावेळी पालकांनी मुलांशी विश्वासाने संवाद साधून त्यांना योग्यवेळी उपचार मिळतील, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहनही मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.