वसई विरारमध्ये १६ ठिकाणी पुन्हा ईडीची कारवाई; आर्किटेक्ट आणि मनपा अभियंता रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:43 IST2025-07-01T17:43:23+5:302025-07-01T17:43:23+5:30
शहरातील आर्किटेक्ट आणि पालिका अभियंंत्यांच्या निवासस्थानी व कार्यालयात छापे टाकले आहे.

वसई विरारमध्ये १६ ठिकाणी पुन्हा ईडीची कारवाई; आर्किटेक्ट आणि मनपा अभियंता रडारवर
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी सकाळी वसई विरारमध्ये १६ ठिकाणी छापे टाकल्याने खळबळ माजली आहे. शहरातील आर्किटेक्ट आणि पालिका अभियंंत्यांच्या निवासस्थानी व कार्यालयात छापे टाकले आहे. नालासोपारा मधील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणात पालिकेचे माजी नगररचना संचालक वाय.एस.रेड्डी यांच्यावरील कारवाईत मिळालेल्या माहितीनंतर हे छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांकडून कळते.
१४ मे रोजी ईडीने केलेल्या मोठ्या छापेमारीनंतर नालासोपारातील ४१ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी ईडीने एकाचवेळी १३ ठिकाणी छापे टाकले होते. या मोहिमेतील सर्वात मोठ घबाड वाय. एस. रेड्डी याच्या हैदराबादमधील घरातून सापडले. छाप्यात ८.६ कोटींची रोख रक्कम तसेच २३.२५ कोटींचे हिरेजडित दागिने तसेच सोने व चांदी जप्त करण्यात आली होती. रेड्डी यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आली कुठून त्याचा ईडी तपास करत होते. ईडीच्या तपासातून मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट सहभाग उघड झाला होता. ईडीने जप्त केलेल्या दस्तऐवजांतून मनपातील भ्रष्टाचाराचे मोठं जाळे उघडकीस आले होते. त्या माहितीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ईडीने अचानक या प्रकरणाशी संबंधित आर्किटेक्ट आणि नगररचना विभागातील अभियंत्याच्या घरी व कार्यालयात छापे टाकले आहे. या कारवाईचा अधिकृत तपशील अद्याप ईडीकडून जाहीर करण्यात आलेला नाही. इमारतींंना परवानी देण्यासाठी आर्किटेक्टच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केला जात असल्याचा आरोप आहे. रेड्डी यांच्यावरील कारवाईनतंर अनेक आर्किटेक्ट परदेशात निघून गेले होते. मात्र प्रकरण निवळण्याचे समजून ते परतले होते.
काय आहे प्रकरण?
नालासोपाऱ्याच्या अग्रवाल नगरी येथील ४१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर ईडीने या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. या अनधिकृत इमारती माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याने बांधल्या होत्या. याप्रकरणात मनपाचे अधिकारी आणि नगररनचा उपसंचालक वाय एस रेड्डी जबाबदार असल्याची तक्रार माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी ईडीकडे केली होती. येथील रहिवाशांना बेघर करण्याचे षडयंत्र आखण्यात आले असून त्याची चौकशी करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली होती. त्यानुसार मार्च महिन्यापासून ईडी या प्रकरणाचा पाठपुरावा करून चौकशी करत होती.