वर्ध्यात शेतकऱ्यांचा असंतोष उफाळला: पाणंद रस्ता न मिळाल्यास रेल्वे रोखणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:44 IST2025-05-28T18:40:32+5:302025-05-28T18:44:48+5:30
वर्धा-नांदेड रेल्वेमुळे अडकले शेतकरी : संतप्त शेतकऱ्यांचा रेल रोकोचा इशारा!

Farmers' discontent erupts in Wardha: Will block railway if Panand road is not provided!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामात सालोड (हिरापूर) येथून नागठाणाकडे जाणारा पाणंद रस्ता रेल्वेकामात बंद झाला. शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने रेल्वे विभागाने रेल्वे क्रॉसिंगलगत पाणंद रस्ता देत खडीकरणाचे आश्वासन दिले होते. मात्र, याला दोन वर्षांचा कार्यकाळ लोटला, तरी खडीकणाच्या कामासाठी साधी खडीही पडली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वर्धा-नांदेड या रेल्वे मार्गाचे
कळंबपर्यंत काम पूर्ण झाले. या मार्गावर रेल्वेगाडीही सुरू झाली आहे. या मार्गावर सालोड (हिरापूर)-पुलगाव मार्गावर रेल्वे क्रॉसिंग आहे. या क्रॉसिंगपासून नागठाणा येथे रस्ता जातो. या कामात हा पाणंद रस्ता बंद केला होता. वहिवाटीचा प्रश्न उद्भवल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीला अर्ज, निवेदन देऊन पाणंद रस्ता देण्याची मागणी केली होती. मात्र, रेल्वे प्रशासन निवेदनाला गंभीरतेने घेत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. रेल्वे क्रॉसिंगपासून शेतकऱ्यांना रस्ता देत नागठाण्यापर्यंत या नव्या पाणंद रस्त्याचे खडीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते. पण, या गोष्टीला आता दोन वर्षाचा काळ लोटून सुद्धा कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. आता खरीप हंगाम तोंडावर असून, मार्गाने जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून तसा इशाराही रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
...तर रेल रोको आंदोलन
पाणंद रस्त्याच्या खडीकरणासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी रेल्वे विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाकडून रस्ता खडीकरणासाठी कोणतीही हालचाल होताना दिसून येत नाही. त्यामुळे संतापलेल्या सालोड, भैव्यापूर, श्यामपूर या शिवारातील शेतकऱ्यांनी वर्धा ते कळबपर्यंत सुरू असलेली रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच शेतकरीही संतप्त झाले आहे.
दोनशे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न बिकट, हंगामाला सुरुवात
- या पाणंद रस्त्यावर भैयापूर, शामपूर या शेतशिवारात सालोड हिरापूर येथील किमान २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेती आहे.
- शेतकऱ्यांनी अडवणूक केली, तेव्हा आश्वासन दिले होते. मात्र, गत दोन वर्षांत कामासाठी साधी घडीही पडली नाही.
- गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी या रस्त्याची पाहणी करून गेले. पुन्हा तेच आश्वासन देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यात आली, मात्र पावसाळा तोंडावर असून, अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. शेतात बी बियाणे न्यावी कशी, पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.