३० वयापर्यंत, कोणतीही नोकरी न करता उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मोठी संधी : अर्ज करा १७ ऑगस्टपूर्वी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 19:34 IST2025-08-12T19:34:10+5:302025-08-12T19:34:59+5:30
ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी : 'ज्ञानज्योती' योजनेसाठी अर्ज सुरू

Big opportunity for those pursuing higher education without any job till the age of 30: Apply before August 17!
वर्धा : जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेणारे विद्यार्थी वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवली जाते.
मूलभूत पात्रता आणि शैक्षणिक निकष काय ?
योजनेचा लाभ घेण्याकरिता १२वीनंतरचे उच्च शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखांपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी पात्र आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ दिला जातो.
प्रत्येक जिल्ह्यात जवळपास ६०० विद्यार्थ्यांना लाभ
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रतिविद्यार्थी ६०० याप्रमाणे राज्यातील एकूण २१,६०० विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेस डिसेंबर २०२३मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आता जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे.
...अशा आहेत अटी
विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा. या योजनेचा लाभघेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करीत नसावा.
अर्ज कुठे आणि कसा कराल ?
शासनाच्या hmas.mahait.org या ऑनलाइन पोर्टलवर बीए, बीकॉम, बीएससी अशा १२वीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एमए, एमएससी असे पदवीनंतरच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) १७ऑगस्ट २०२५पर्यंत अर्ज भरून ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्र संबंधित वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी लागणार आहे. अशी माहिती प्रशासने दिली आहे.
...ही द्यावी लागतील कागदपत्रे
भाड्याने राहात असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी), स्वयंघोषणापत्र (दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत), कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, भाड्याने राहात असल्याबाबतची भाडे चिठी व भाडे करारपत्र / करारनामा, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा आदी कागदपत्र अर्जासोबत जोडावीत.