ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 06:27 IST2026-01-05T06:27:10+5:302026-01-05T06:27:44+5:30
याला नेमके कोण जबाबदार आहे, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी केदार दिघे यांनी केली.

ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे शहरातूनही मराठी भाषिकांची संख्या झपाट्याने घटत असल्याचा आरोप उद्धवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला आहे.
वाढती महागाई, घरांचे गगनाला भिडलेले दर आणि शहराचे बदलते स्वरूप यामुळे मराठी माणूसाला अंबरनाथ, बदलापूर, कर्जतसारख्या भागात स्थलांतर करण्यास भाग पाडले जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील मूळ शिवसेनेने मराठी माणसाचा आवाज बुलंद ठेवला. त्यामुळेच मुंबईत मराठी अस्मिता टिकून राहिली. मात्र, ठाण्यात सध्या चित्र वेगळे दिसत असून, येथून मराठी माणूस बाहेर फेकला जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
याला नेमके कोण जबाबदार आहे, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर टीका करताना दिघे म्हणाले की, मुंबईतून बाहेर गेलेला मराठी टक्का पुन्हा मुंबईत आणू, अशी वक्तव्ये करणारे सत्ताधारी, त्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातून मराठी माणूस सातत्याने बाहेर जात असताना मात्र गप्प का आहेत? असा सवाल त्यांनी केला.