'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:43 IST2025-12-31T12:42:45+5:302025-12-31T12:43:45+5:30
नगरपालिका एबी फॉर्म गोंधळावर फोनवरून जाब; पक्ष संपवायचाय का?

'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
मंगळवेढा : 'चुकीला माफी नाही' या भूमिकेसाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीतील एबी फॉर्म प्रकरणावरून सोलापूर जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वाची चांगलीच खरडपट्टी काढल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. थेट तक्रारी आल्यानंतर अजित पवारांनी राज्यस्तरीय समन्वयक लतीफ तांबोळी आणि जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना फोन करून जाब विचारल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना "जिल्ह्याचा प्रमुख म्हणून वेळीच लक्ष द्यायला हवे होते", असा स्पष्ट समज देण्यात आला. मात्र एबी फॉर्मच्या गोंधळात अधिक जबाबदारी असलेल्या तांबोळींवर अजित पवारांनी अक्षरशः आगपाखड केल्याचे कळते. "पक्ष दुसऱ्याच्या दावणीला बांधता का? जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसावे लागेल" असा थेट इशाराही त्यांनी दिल्याची जोरदार चर्चा आहे.
खुलासे देत पटवापटवी केल्याची चर्चा
काही पदाधिकाऱ्यांनी खुलासे देत पटवापटवी केल्याची चर्चा असली, तरी राष्ट्रवादीतील अस्वस्थता अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवेढ्यातील उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणते नाट्य घडते आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे पद आपल्या बाजूने वळवते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अजित पवारांच्या तंबीनंतर मंगळवेढ्याच्या राजकारणात पुढील काही दिवस निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.