Satara: वाई तालुक्यातील चित्रपट पर्यटनाला ‘हप्तेखोरी’चे ग्रहण!, निर्मात्यांनी फिरवली पाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:13 IST2026-02-18T17:12:43+5:302026-02-18T17:13:05+5:30
स्थानिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम

संग्रहित छाया
पांडुरंग भिलारे
वाई : निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक वारशामुळे ‘चित्रपट निर्मात्यांचे नंदनवन’ म्हणून ओळख असलेल्या वाई शहरावर सध्या हप्तेखोर टोळ्यांचे संकट घोंगावत आहे. या संकटामुळे काही वर्षांपूर्वी हिंदी-मराठी चित्रपटांचे माहेरघर असलेले वाई आता निर्मात्यांच्या नकाशावरून हळूहळू गायब होत चालले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
कृष्णामाई घाट, मेणवली घाट, पश्चिम भागातील काही गावे, तसेच धोम धरणाचा परिसर निसर्गरम्य आहे. येथे चित्रीकरणासाठी येणाऱ्या चित्रपट पथकांना काही स्थानिक गुंडांकडून शिवीगाळ, दमदाटी व थेट पैशांची मागणी केली जाते. प्रशासकीय परवाने व सर्व शुल्क भरूनही या टोळ्या बेकायदेशीर ‘हप्ते’ मागतात.
हप्ते न दिल्यास चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली जाते, असे गंभीर आरोप निर्मात्यांकडून होत आहेत. या दहशतीमुळे अनेक नामांकित निर्माते वाईकडे पाठ फिरवून आता भोर तालुक्याकडे वळत आहेत. कारण भोरमध्ये ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक व प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य आणि सुरक्षेची हमी मिळत असल्याचे निर्माते सांगतात.
स्थानिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम...
चित्रीकरणामुळे स्थानिक युवकांना केटरिंग, ट्रान्सपोर्ट, लॉजिंग, हॉटेलिंगसारख्या क्षेत्रांत रोजगार मिळत होता. मात्र, चित्रीकरण घटल्याने अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाईतील हॉटेल व्यवसाय, छोटे दुकानदार आणि मजूर यांचे अर्थचक्र कोलमडू लागले आहे.
वाई पुन्हा चित्रपटनगरी व्हावी
निसर्गाने वाईला भरभरून दिले आहे; पण काही आडमुठ्या लोकांच्या दहशतीमुळे चित्रपटसृष्टीने वाईकडे पाठ फिरवली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला, तर वाई पुन्हा चित्रपटनगरी म्हणून ओळख निर्माण करू शकते.
कठोर भूमिका घेण्याची गरज
वाई तालुक्यात आजवर अनेक दर्जेदार हिंदी-मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. शहर व तालुक्याला पुन्हा चित्रपट निर्मितीचे केंद्र बनवायचे असेल, तर हप्तेखोरांवर कठोर कारवाई, निर्मात्यांना संरक्षण देऊन प्रशासनाने ठोस भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा वाईची ओळख केवळ पर्यटनापुरतीच मर्यादित राहील आणि रोजगाराच्या संधी कायमस्वरूपी निघून जातील, अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत.