देशाच्या प्रगतीत संविधानाचा वाटा महत्त्वाचा- उदयनराजे भोसले
By सचिन काकडे | Updated: April 14, 2024 17:11 IST2024-04-14T17:11:18+5:302024-04-14T17:11:29+5:30
साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

देशाच्या प्रगतीत संविधानाचा वाटा महत्त्वाचा- उदयनराजे भोसले
सातारा: 'महामानव व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला एक चांगला मार्गदाता दिला आहे. देश प्रगतीपथावर येण्यासाठी संविधानाने महत्त्वाचा वाटा उचलला असून, या महामानवाचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा, अशा भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेसमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले. त्यांचा सहवास आम्हाला लाभला नसला तरी त्यांच्या विचाराचा सहवास आम्हाला नेहमीच मार्गदर्शक ठरलेला आहे. सर्व जाती-धर्माचा विचार करून त्यांनी संविधानाची निर्मिती केली. अफाट व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर युगपुरुषांची आपण नेहमीच आठवण ठेवली पाहिजे. सर्वांनी जयंती सोहळा आनंदाने साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रवीण धस्के, विजय बडेकर, अण्णा वायदंडे, सतीश रावखंडे, डॉ. अच्युत गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते संतोष नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.