सांगली महापालिकेतील पहिल्याच दिवशी महापौर ॲक्शन मोडवर, विभागनिहाय घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:46 IST2026-02-12T17:45:45+5:302026-02-12T17:46:13+5:30
शुक्रवारपासून थेट विभागातच बैठका

सांगली महापालिकेतील पहिल्याच दिवशी महापौर ॲक्शन मोडवर, विभागनिहाय घेतला आढावा
सांगली : महापौरपदाचा पदभार स्वीकारताच धीरज सूर्यवंशी यांनी कामकाजाला वेग देण्याचे संकेत दिले. पहिल्याच दिवशी आढावा बैठक घेत नागरिकांच्या हिताच्या कामाला प्राथमिकता देण्याची सूचना प्रशासनाला केली, तसेच शुक्रवारपासून विभागनिहाय स्वतंत्र बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा इरादाही स्पष्ट केला.
महापालिकेच्या कै. राजाभाऊ जगदाळे सभागृहात झालेल्या या बैठकीला उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेते संदीप आवटी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, स्मृती पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी नूतन महापौर, उपमहापौर व सभागृह नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर सर्व खातेप्रमुखांनी आपल्या विभागाच्या कामकाजाची सविस्तर माहिती सादर केली. यावेळी महापौर सूर्यवंशी यांनी पाणी, ड्रेनेज, घरपट्टी, पाणीपट्टी, आरोग्य, मालमत्ता विभागाचा आढावा घेतला. नागरिकांना मुबलक पाणी देण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा अहवाल तयार करण्याची सूचना केली. याबाबत दोन दिवसांत पाणीपुरवठा विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचा अडचणीही जाणून घेतल्या जातील, असेही महापौरांनी सांगितले.
महापालिकेचे जे प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत, ते संबंधित मंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक विभागाचे प्रश्न मुळापासून सोडवण्यासाठी आगामी ५-६ दिवसांत स्वतंत्र बैठकांचे नियोजन केले आहे. शुक्रवारपासून घरपट्टी आणि स्वच्छता विभागाच्या विशेष बैठका घेऊन धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी आकृतिबंध आणि रिक्त पदांच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. उपायुक्त स्मृती पाटील यांनी सूचनांचे काटेकोर पालन करून निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
पालकमंत्र्याकडून सूचना
महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेते संदीप आवटी यांनी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी स्वच्छ व पारदर्शी कारभारासोबतच जनतेच्या हिताला प्राथमिकता देण्याचे निर्देश दिले. महापालिका क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी दिवसभरात जिल्हा नियोजन समितीसह विविध बैठकांना हजेरी लावली.