Sangli Politics: शिराळ्यात राजकीय पक्षापेक्षा गटनेत्यांच्या अस्तित्वाची लढाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:27 IST2025-06-09T19:26:41+5:302025-06-09T19:27:22+5:30
माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या भूमिकेचे राजकीय गणित आजही कोणाला कळले नाही

Sangli Politics: शिराळ्यात राजकीय पक्षापेक्षा गटनेत्यांच्या अस्तित्वाची लढाई
अशोक पाटील
इस्लामपूर : शिराळा मतदारसंघात पारंपरिक तीन गट आहेत. त्यातच आता महाडिक गटाची भर पडली आहे. नव्याने निर्माण झालेल्या अजित पवार गटात माजी मंत्री शिवाजीराव नाईक दाखल झाले. त्यामुळे मतदारसंघात पाच स्वयंभू नेते पक्षीय पातळीवर कार्यरत असले, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गटनेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकणार आहे. निवडणुकीत अंतिम टप्प्यात मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत आहेत.
शिराळा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक आणि आता नव्याने झालेले आमदार सत्यजीत देशमुख असे तीन पारंपरिक गट आहेत. त्यातच आमदार सत्यजीत देशमुख यांनी महाडिक गटाशी जुळवून घेत आमदार पदाला गवसणी घातली आहे. परंतु, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षवाढीपेक्षा स्वत:च्या गटाचे अस्तित्व टिकवण्यासाठी नेते प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर मतदारसंघातील राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे.
माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या भूमिकेचे राजकीय गणित आजही कोणाला कळले नाही. मुंबईत गेले की, अजित पवार गट, मतदारसंघात आले की, आमदार जयंत पाटील यांच्या गटाबरोबर राहून राजकीय सूत्रे हलविण्याचा फंडा विधानसभा निवडणुकीत मोडीत निघाला. त्यामुळेच सध्यातरी उद्योग क्षेत्रात प्रगती करण्याचा डाव माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आखला आहे.
भविष्यातील राजकीय वेध घेऊनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरण्याची खेळी आखली आहे. तर त्यांच्यापासून फारक घेतलेले माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारून स्वत:च्या अस्तिवाचा पाचवा गट निर्माण केला आहे. सध्या नाईक अजित पवार गटाची ताकद वाढविण्यात व्यस्त आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपामध्येच नवीन उदयास आलेला गट म्हणजे राहुल आणि सम्राट महाडिक यांची ताकद आमदार सत्यजीत देशमुख यांच्या कामी आली असली, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपापेक्षा स्वत:च्या गटाची ताकद दाखवावी लागणार आहे. एकंदरीत शिराळा मतदारसंघात पक्षीय पातळीपेक्षा स्वबळाची ताकद प्रत्येक गटनेत्याला दाखवावी लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जवळ आली असली, तरी काही पक्ष किंवा गटांनी आपले राजकीय पत्ते खुले केलेले नाहीत. पारंपरिक तीन गट आजही कार्यरत आहेत. त्यातच आता महाडिक गटाची भर पडल्याने शिराळा मतदारसंघात स्वत:चे नेतृव बळकट करण्याचा प्रयत्न नेत्यांचा राहणार आहे. - माजी आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष