उन्हाळा सुरू झाला की लहान मुलांना अनेक छोट्या-छोट्या त्रासांचा सामना करावा लागतो. मोठ्यांना जसं आपली अस्वस्थता सांगता येते, तसं मुलांना नेहमीच सांगता येत नाही. त्यामुळे घामोळं येणं, केसांत उवा होणं, घामामुळे खाज येणं किंवा डिहायड्रेशन होणं या समस्या पालकांनी स्वतःहून ओळखून त्यावर योग्य काळजी घेणं खूप गरजेचं असतं.
सर्वात आधी घामोळ्याबद्दल बोलायचं झालं, तर उष्णतेमुळे मुलांच्या त्वचेवर लहान-लहान पुरळ येतात आणि खाज सुटते. अशा वेळी मुलांना सैल, कॉटनचे कपडे घालणे आवश्यक आहे. हवेशीर कपडे वापरणं गरजेचं आहे दिवसातून एकदा तरी अंघोळ घालावी आणि त्वचा कोरडी व स्वच्छ ठेवावी. टॅल्कम पावडर वापरली तर घामोळं कमी होण्यास मदत होते. (Summer tips - parenting tips , take care of children in summer little extra, see why )मुलं वारंवार अंग चोळत असतील किंवा चिडचिड करत असतील, तर त्यांना खाज होत असल्याची शक्यता लक्षात घ्या. चंदनाचा लेप लावा. तसेच जास्तच पुरळ असेल तर डॉक्टरांकडे जा.
केसांत उवा होणं हीदेखील उन्हाळ्यात सामान्य समस्या आहे. घाम आणि उष्णतेमुळे उवा पटकन वाढतात. त्यामुळे मुलांचे केस स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून २–३ वेळा शॅम्पूने धुणे आणि बारीक कंगव्याने केस विंचरणे आवश्यक आहे. मुलं वारंवार डोकं खाजवत असतील किंवा झोपताना अस्वस्थ होत असतील, तर उवा असण्याची शक्यता असते.
घामामुळे शरीरावर खाज येणंही मुलांना त्रासदायक ठरतं. यासाठी त्वचा कोरडी ठेवणं, हलकं थंड पाण्याने अंघोळ घालणं आणि गरज असल्यास खोबरेल तेलासारखं हलकं तेल लावणं उपयोगी ठरतं.
मुलं चिडचिड करत असतील, वारंवार रडत असतील किंवा शांत बसत नसतील, तर त्यांना अस्वस्थता होत असल्याचा तो संकेत असू शकतो. उन्हाळ्यातील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे डिहायड्रेशन. मुलं खेळण्यात गुंग होतात आणि पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना वेळोवेळी पाणी, ताक, लिंबूपाणी किंवा फळांचे रस देणे गरजेचे आहे. ओठ कोरडे पडणे, लघवी कमी होणे, थकवा जाणवणे हे डिहायड्रेशनची लक्षणं असू शकतात. अशा वेळी लगेच द्रवपदार्थ देणं आवश्यक आहे.
मुलांना आपला त्रास स्पष्टपणे सांगता येत नाही, त्यामुळे त्यांच्या वागण्यात होणारे बदल ओळखणं महत्त्वाचं आहे. ते अचानक शांत होणं, जास्त रडणं, झोप न लागणं किंवा खेळण्यात रस कमी होणं हे संकेत असू शकतात. पालकांनी अशा बदलांकडे दुर्लक्ष न करता त्यामागचं कारण समजून घ्यावं. एकंदरीत, उन्हाळ्यात मुलांची काळजी घेण्यासाठी स्वच्छता, योग्य कपडे, पुरेसं पाणी आणि त्यांच्या वागण्याकडे बारकाईने लक्ष देणं हे अत्यंत आवश्यक आहे. थोडी जागरुकता आणि प्रेमळ काळजी घेतली तर मुलं हा ऋतू आनंदात आणि निरोगीपणे घालवू शकतात.
