डॉ. शशिकांत एच. कापडणीस
उन्हाळ्याचे दिवस असल्याने साहजिकच थंड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. बाहेर उष्ण वातावरण असते त्यामुळे थंडगार पदार्थ खावेसे वाटतात. अशामध्ये मग फ्रिजमधलं गारेगार दहीसुद्धा खाल्लं जातं. कारण दही खाल्लं की शरीराला थंडावा मिळतो, असा बहुसंख्य लोकांचा समज असतो. परंतु आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही धारणा पूर्णपणे खरी नाही. आयुर्वेदानुसार दही हे थंड नसून उष्ण गुणधर्माचे आहे. त्यामुळे ते शरीरातील उष्णता व काही दोष वाढवू शकते. आणि त्यातही जर तुम्ही दही चुकीच्या पद्धतीने खात असाल तर हा त्रास जास्तच वाढू शकतो. म्हणूनच दही खाण्याची योग्य पद्धत कोणती, तसेच दही कोणी खावं आणि कोणी टाळावं, दही खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याविषयीची ही खास माहिती...
उन्हाळ्यात कुणी-किती आणि कधी दही खावं?
१. आयुर्वेदात “दधि” असे संबोधले जाणारे दही भूक वाढवणारे, पचनशक्ती प्रदीप्त करणारे आणि शरीराला पोषण देणारे आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात घेतल्यास ते फायदेशीर ठरते. मात्र ते जड, पचायला अवघड, आंबट व कफ-पित्त वाढवणारे आहे. म्हणूनच दही आरोग्यदायी असले तरी ते प्रत्येकाला आणि प्रत्येक वेळी योग्य ठरेलच असे नाही.
२. दह्याचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते “अभिष्यंदी” आहे, म्हणजेच शरीरातील सूक्ष्म नलिका बंद करण्याची त्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे त्याचे अति सेवन केल्यास सर्दी, कफ वाढणे, त्वचारोग, सूज किंवा अॅलर्जी यासारखे त्रास होऊ शकतात. विशेषतः कफ किंवा पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी दही मर्यादितच खावे.
३. बरेच लोक रात्रीच्या वेळीही दही खातात. हे अतिशय चूक आहे. कारण आयुर्वेदानुसार रात्री कफदोष नैसर्गिकरित्या वाढलेला असतो. दही हे सुद्धा कफवर्धक असल्याने त्यामुळे सर्दी, सायनस, घशाचे विकार आणि जडपणा असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी दही खाणं टाळायलाच हवं.
४. उन्हाळा, वसंत आणि शरद ऋतूंमध्ये शरीरात पित्तदोष वाढलेला असतो आणि दही त्यात अधिक भर घालते. परिणामी अॅसिडिटी, त्वचेचे विकार किंवा अंगावर पुरळ यांसारख्या समस्या वाढण्याची शक्यता असते.
दही खाण्याची योग्य पद्धत
योग्य पद्धतीने दही खाल्ल्यास त्याचे शरीराला निश्चितच लाभ मिळू शकतात.. दह्यामध्ये नेहमी साखर, तूप, मध किंवा आवळा खावा. यामुळे ते बाधत नाही. मात्र रोज दही खाणे, जास्त आंबट किंवा अर्धवट जमलेले दही खाणे, तसेच दही गरम करून खाणे या सवयी टाळणे आवश्यक आहे.
ज्वर, त्वचारोग आणि मधुमेह अशा आजारांमध्ये दही खाणे टाळावे. एकंदरीतच दही आरोग्यासाठी चांगले की वाईट हे त्याच्या गुणधर्मावर नव्हे, तर आपण ते कसे, कधी आणि किती प्रमाणात घेतो यावर अवलंबून असते.
डॉ. शशिकांत एच. कापडणीस
आयुर्वेदाचार्य / पंचकर्म विशेषज्ञ (केरळ)
यश क्लिनिक, सटाणा (जि. नाशिक)
