"निवडणूक बिनविरोध करणंच योग्य"; बारामतीच्या पोटनिवडणुकीवरुन शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:48 IST2026-04-09T11:48:17+5:302026-04-09T11:48:17+5:30
Sharad Pawar on Baramati Byelection: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचे विधान ...

"निवडणूक बिनविरोध करणंच योग्य"; बारामतीच्या पोटनिवडणुकीवरुन शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला
Sharad Pawar on Baramati Byelection: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी उमेदवार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही प्रयत्न केले जात आहे. अशातच शरद पवार यांनीही काँग्रेसला उमेदवारी मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. बारामतीची ही जागा एका अपघातामुळे रिक्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध करणेच योग्य ठरेल, असा थेट सल्ला पवारांनी काँग्रेसला दिला आहे.
माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उभ्या राहिल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे असली, तरी त्यांनी तिथे उमेदवार दिला नाही. मात्र काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. यावरुन शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवारांचा 'सल्ला'
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, "काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि आम्ही त्यांना काही सांगू शकत नाही. पण जी जागा रिक्त झाली ती अपघातामुळे. महाराष्ट्राने एक कतृत्ववान प्रतिनिधी गमावला. मला विचारलं तर मी काँग्रेसला सल्ला देईल की या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे हा माझा सल्ला आहे."
सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
खासदार सुप्रिया सुळे यांनीही काँग्रेसला उमेदवार मागे घेण्याची विनंती केली आहे. "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्युनंतर बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लागली आहे. यापूर्वी अजितदादांनी कॉंग्रेससोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आपल्या पक्षासोबत त्यांचे नेहमीच सौहार्दाचे संबंध होते. या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणे ही अजितदादांना आदरांजली ठरेल. तरी माझी कॉंग्रेस पक्षाला नम्र विनंती आहे की कृपया आपण आपला उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.