PMC Elections : 'नेकी का काम आंदेकर का नाम..' बघा मला लोकशाहीत कसं आणलय'; उमेदवारी अर्ज भरताना बंडू आंदेकरची घोषणाबाजी
By किरण शिंदे | Updated: December 27, 2025 14:49 IST2025-12-27T14:48:58+5:302025-12-27T14:49:49+5:30
- “बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय”, “आंदेकरांना मत म्हणजे विकासकामाला मत” अशा घोषणा त्याने दिल्या.

PMC Elections : 'नेकी का काम आंदेकर का नाम..' बघा मला लोकशाहीत कसं आणलय'; उमेदवारी अर्ज भरताना बंडू आंदेकरची घोषणाबाजी
पुणे - शहरातील कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला असून, त्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरवातीला सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आलेल्या बंडू आंदेकरने घोषणा दिल्या, “नेकी का काम आंदेकर का नाम”, “बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय”, “आंदेकरांना मत म्हणजे विकासकामाला मत” अशा घोषणा त्याने दिल्या. दोरखंड बांधलेल्या अवस्थेत आंदेकरला पोलिसांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आणले होते. यावेळी माध्यमांसमोरून जात असताना बंडू आंदेकरने “मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही” अशी घोषणा देत आंदेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचं पाहायला मिळालं. लोकशाही मार्गानेच जनतेच्या पाठबळावर आपण निवडणूक लढवत असल्याचा दावा त्यांनी केला. इतकेच नाही तर त्याने यावेळी वनराज आंदेकर जिंदाबादच्या घोषणाही दिल्या.
आयुष कोमकरच्या आईची भावनिक विनंती
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, आयुष कोमकरच्या आई संजीवनी कोमकर यांनी माध्यमांशी बोलताना आंदेकर कुटुंबियांना कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी कळकळीची विनंती केली होती.'जर आम्हाला न्याय देता येत नसेल, तर किमान अन्याय तरी करू नका. माझ्या लहान मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. सत्ता होती म्हणून त्यांनी आजवर सर्व काही केलं. कृपया त्यांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका' असे त्या म्हणाल्या.
तसेच, जो पक्ष आंदेकरांना तिकीट देईल, त्या पक्षाच्या कार्यालयासमोर जाऊन मी आत्मदहन करेन. मला माझ्या गोविंदाला न्याय हवा आहे. एवढेच मला पाहिजे.. अशी भावनिक प्रतिक्रिया संजीवनी कोमकर यांनी व्यक्त केली होती. या संपूर्ण घटनेमुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, आज होणाऱ्या उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.