Sharad Pawar: साडेचार वर्षे या सरकारला लाडक्या बहिणीची आठवण झाली नाही का? शरद पवारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 13:43 IST2024-10-28T13:42:44+5:302024-10-28T13:43:45+5:30
लोकसभेत लोकांनी धडा शिकवल्यानंतर त्यांना लाडक्या बहिणीची आठवण झाली तरी उद्याच्या निवडणुकीत मतदार तीच भूमिका घेतील

Sharad Pawar: साडेचार वर्षे या सरकारला लाडक्या बहिणीची आठवण झाली नाही का? शरद पवारांचा सवाल
बारामती : निवडणूकीला उभा राहणारा प्रत्येकजण मी निवडून येणार असे म्हणत असतो. साडेचार वर्ष या सरकारकडे सत्ता असताना त्यांना बहिणीची आठवण झाली नाही, लोकसभा निवडणूकीनंतर ही आठवण आली आहे. कारण लोकांनी धडा शिकवला आहे, उद्याच्या निवडणूकीतही लोक तिच भूमिका निश्चितपणे घेतील, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी लाडकी बहिण योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला.
बारामतीतयुगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी युगेंद्र पवार उपस्थित होते. लाडकी बहिण योजनेमुळे महायुती सत्तेवर येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना ते बोलत होते.
राज्यात काही मतदारसंघात मविआच्या दोन घटक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ज्या जागांवर काही अडचण असेल तेथे दोन्ही पक्षांना फॉर्म भरुन ठेवायला सांगितले आहे. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अजून अवकाश आहे. आघाडीत अशी चर्चा करण्याची आवश्यकता असते, बहुसंख्य ठिकाणी एकमत आहे, काही ठिकाणी अडचणी आहे त्यातून आम्ही निश्चित मार्ग काढु, कोण किती जागा लढवेल हे मला माहित नाही. आमचे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष ते काम पाहतात. उरलेली यादी ते आज जाहीर करतील,असे पवार म्हणाले.
युगेंद्र पवार या एका अत्यंत उच्चशिक्षीत युवकास महाविकास आघाडीच्यावतीने आम्ही बारामती विधानसभा मतदारसंघातून संधी दिली आहे. ते उच्चशिक्षित पदवीधर आहेत. परदेशात त्यांचे शिक्षण झाले आहे. प्रशासन, व्यवसायातील त्यांना माहिती आहे. विशेषतः साखर धंदा, ऊसाचे पिक यातील ते जाणकार आहेत. त्यांना बारामतीची जनता नव्या पिढीतील नव्या नेतृत्वाचा स्वीकार करुन त्यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी करतील. मी ५७ वर्षापूर्वी बारामतीच्या तहसिल कार्यालयात स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो होतो, त्या नंतर आजपर्यंत बारामतीच्या जनतेने मला निवडून दिले आहे. सलग ५७ वर्ष एखाद्या व्यक्तीला सतत निवडून देण्याचे कारण जनतेशी बांधिलकी हे होते. नव्या उमेदवारांना माझे हेच सांगणे आहे की जनतेशी कायम बांधिलकी ठेवा, जनतेने निवडून दिल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहा, हाच माझा युगेंद्र पवार यांना सल्ला असल्याचे पवार म्हणाले.
विधानसभेला काय घडेल यावर बोलताना पवार म्हणाले, बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे, तितकी फार क्वचित मर्यादीत लोकांना असू शकेल, माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे, आजपर्यंतच्या सर्व निवडणूकात बारामतीकरांनी मला निवडून दिले आहे.सुरवातीला निवडणूकांसाठी मला बारामतीत राहावे लागायचे, नंतर बारामतीकरांनीच माझी जबाबदारी घेतली होती, आजही माझा बारामतीकरांवर विश्वास आहे, युगेंद्र पवार यांनाच बारामतीकर मोठ्या मताधिक्याने विजयी करतील,असा विश्वास देखील पवार यांनी व्यक्त केला.