IPL 2020 रद्द करणं बीसीसीआयला परवडलं नसतं, जाणून घ्या का ?

इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) मुहूर्त अखेर ठरला. 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचा 13वा मोसम संयुक्त अरब अमिराती येथे रंगणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्यासाठी सर्व तयारी सुरू केली आहे.

कोरोना व्हायरसमुळे 29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्याचे जाहीर केले अन् आयपीएलचा मार्ग मोकळा झाला. आयपीएल रद्द होणं, हे बीसीसीआयला परवडलं नसतं.

जागतिक क्रिकेट संघटनांमध्ये बीसीसीआय ही सर्वात श्रीमंत संघटना आहे आणि आयपीएलच्या माध्यमातून त्यांना होणारा नफाही खूप आहे. त्यामुळेच आयपीएलसाठी बीसीसीआय आग्रही होते आणि त्यांना अखेर यश मिळाले. आता फक्त त्यांना केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.

पण, आयपीएल झाली नसती तर काय?

आयपीएलसाठी स्टार टीव्हीनं बीसीसीआसोबत प्रती वर्ष 3300 कोटींचा करार केला आहे. स्टारनं यंदाच्या आयपीएलसाठी बीसीसीआयला 2000 कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे आयपीएल झाली नसती तर बीसीसीआयला 3300 कोटींवर पाणी फेरावे लागले असते.

Vivo सोबत टायटल स्पॉन्सर म्हणून बीसीसीआयला प्रतीवर्ष 440 कोटी मिळतात. त्यामुळे भारत-चीन सीमेवरील वाद चिघळल्यानंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी झाल्यानंतरही बीसीसीआयनं मौन धरणं योग्य समजलं.

Dream11, PayTM, CEAT आदी स्पॉन्सर्सकडून बीसीआयला 170 कोटींचा नफा होतो.

आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून भारतीय क्रिकेटपटूंचा पगार, स्थानिक स्पर्धांच्या आयोजनाचा खर्च उचलला जातो. आयपीएलमधील महसूलातून वर्षाला 2000 स्थानिक क्रिकेट सामने खेळवले जातात.

त्याव्यतिरिक्त महिला क्रिकेट आणि अन्य ग्रासरूट लेव्हलच्या अॅक्टिव्हिटी या पैशातून घेतल्या जातात.

Read in English