"देश प्रथम, पैसा नंतर, आयपीएलचे चीनशी असलेले नाते तोडा", या संघमालकाची रोखठोक भूमिका

बीसीसीआयकडून आयोजित केल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमधून चिनी प्रायोजक कंपन्यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आधी झालेला कोरोना विषाणूचा फैलाव आणि नंतर चिनी सैनिकांनी लडाखमध्ये केलेली घुसखोरी तसेच गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्यामुळे सध्या देशात चीनविरोधात वातावरण तापलेले आहे.

अशा परिस्थितीत बीसीसीआयकडून आयोजित केल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमधून चिनी प्रायोजक कंपन्यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आता थेट आयपीएलमधील एका संघमालकानेही या लीगमधील चिनी प्रायोजकांविरोधात आवाज उठवला आहे.

लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगमधील चिनी कंपन्यांचे प्रायोजकत्व हळूहळू संपुष्टात आणावे अशी मागणी आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांनी केली आहे.

१५ जून रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकाशी झालेल्या झटापतीत भारताच्या २० जवानांना आलेल्या वीरमरणानंतर देशात चीनच्या बहिष्काराची मागणी वाढत आहे. त्यामुळे बीसीसीआयलासुद्धा चिनी कंपन्यांच्या प्रायोजनाची समीक्षा करण्यासाठी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक बोलवावी लागली होती. मात्र ही बैठक आतापर्यंत होऊ शकलेली नाही.

दरम्यान, केंद्र सरकारने चिनी मोबाईल अॅपविरोधात कडक भूमिका घेत ५९ अॅपवर बंदी घातली होती.

त्या पार्श्वभूमीवर आयपीएलमधीली चिनी कंपन्यांच्या प्रायोजकत्वाबाबत नेस वाडिया म्हणाले की, आपण देशासाठी आयपीएलमधून चिनी प्रायोजक कंपन्यांना डच्चू देण्यासारखा निर्णय घेतला पाहिजे. आपल्यासाठी देश प्रथम आहे, पैसा नंतर. ही इंडियन प्रीमियर लीग आहे, चीन प्रीमियर लीग नाही. त्यासाठी आपण उदाहरण समोर ठेवले पाहिजे.

चिनी कंपन्यांना प्रायोजकत्वातून हटवल्यास सुरुवातीला नवे प्रायोजक शोधणे कठीण होईल, मात्र चिनी कंपन्यांची जागा घेऊ शकतील असे भारतीय प्रायोजक उपलब्ध आहेत. आपण देश आणि सरकारचा मान ठेवला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी प्राण तळहातावर घेणाऱ्या आपल्या सैनिकांचा मान राखला पाहिजे, असे वाडिया म्हणाले.