होय हे खरं आहे; स्कॉटलंड संघाकडून राहुल द्रविड खेळलाय 11 वन डे, पाच प्रसंग जे तुम्हाला माहितही नसतील!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटचा व क्रिकेटपटूंचा मोठा दबदबा आहे. आता तर एकाच वेळी भारताचे दोन संघ वेगवेगळ्या देशांना कडवी टक्कर देतील, एवढे मातब्बर खेळाडू संघाकडे आहेत. भारतीय संघाचा व खेळाडूंचा मोठा चाहतावर्ग आहे, त्यामुळे खेळाडू व संघ यांच्याबाबतीत अनेक बारिकसारिक गोष्टी त्यांना माहित असतात. पण, आज आम्ही अशा पाच गोष्टी सांगणार आहोत, की ज्या अनेकांना कदाचित माहीत असतील.

विराट कोहली हा त्याच्या फटकेबाजीनं नेहमी चर्चेत असतो, परंतु भारतीय कर्णधार हा जगातील एकमेव असा गोलंदाज आहे की ज्यानं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अधिकृत चेंडू न टाकला विकेट घेतली आहे. 31 ऑगस्ट 2011मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात हा प्रसंग घडला होता. सामन्याच्या 8व्या षटकात कोहलीला गोलंदाजीला पाचारण केलं होतं. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर स्ट्राईकवर केव्हीन पीटरसन होता आणि कोहलीनं टाकलेला तो चेंडू लेग साईडला गेला. तो चेंडू वाईड होता, परंतु पीटरसनचा तोल गेला अन् महेंद्रसिंग धोनीनं त्याला लगेच यष्टिचीत केलं. त्या चेंडूवर पीटरसन बाद झाला अन् कोहलीची ती पहिली विकेट ठरली. कोहलीनं 89 ट्वेंटी-20त 4 विकेट्स घेतल्या आहेत.

पंजाब किंग्सचा मनदीप सिंह यानं आयपीएलमध्ये 104 सामन्यांत 1659 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 6 अर्धशतकं आहेत. त्यानं भारताकडून तीन ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत आणि त्यात 87 धावा केल्या आहेत. पण, 2015 मध्ये तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळला होता, हे किती जणांना माहित्येय? भारत अ व दक्षिण आफ्रिका अ संघाच्या सामन्यात आफ्रिकेचे चार खेळाडू पोटदुखीमुळे आजारी पडले. तेव्हा आफ्रिकेनं बदली खेळाडू म्हणून मनदीप सिंगला भारत अ संघाविरुद्ध खेळवले होते.

आज संपूर्ण जग विराट कोहलीला सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखतं... पण, 2017 मध्ये विराट कोहलीनं आयसीसीच्या अव्वल 10 अष्टपैलू खेळाडूंमध्ये स्थान पटकावले होते. तो दहाव्या क्रमांकावर होता. नोव्हेंबर 2017मध्ये जाहीर झालेल्या क्रमवारीत 190 गुणांसह कोहली दहाव्या स्थानी होता. बांगलादेशचा शाकिब अल हसन तेव्हा अव्वल स्थानावर होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2017 मध्ये कोहलीनं ट्वेंटी-20त एकही षटक टाकले नव्हते.

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड यानं कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये 10 हजाराच्यावर धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरनंतर भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत तो ( 13288) दुसऱ्या क्रमांकावर आहे. वन डे तही त्याच्या नावावर 10889 धावा आहेत. पण, 2003मध्ये राहुल द्रविड स्कॉटलंडकडून 11 वन डे खेळलाय, हे माहित्येय का? राहुल द्रविडनं त्या 11 सामन्यांत 60च्या सरासरीनं 600 धावा केल्या होत्या. स्कॉटलंड क्रिकेटला मार्गदर्शन करण्यासाठी द्रविड तेथे गेला होता.

हे असं कसं घडलं असेल, याचे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. पण 2007मध्ये हे घडलं आहे. मे 2007मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ढाका येथे दुसरी कसोटी खेळवण्यात आली. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 610 धावा केल्या. धावफलकावर 408 धावा असताना भारतानं पहिली विकेट गमावली, परंतु या धावा करण्यासाठी चार फलंदाजांनी हातभार लावला. वासीम जाफर व दिनेश कार्तिक हे सलामीला आहे. पहिल्या दिवसाच्या टी ब्रेकला कार्तिक रिटायर्ड झाला, त्यानंतर राहुल द्रविड फलंदाजीला आला अन् 281 धावा असताना जाफरही ( 138 धावा) रिटायर्ड झाला. त्यानंतर सचिन तेंडुलकर व द्रविडनं फटकेबाजी केली. धावफलकार 406 धावा झळकल्यानंतर द्रविड बाद झाला. त्यानंतर कार्तिक पुन्हा फलंदाजीला आला व 129 धावा करून माघारी परतला. सचिन 122 धावांवर नाबाद राहिला.