कर्जमाफी, तिसरी-चौथी मुंबई आणि एआय... राज्याच्या अर्थसंकल्पातील १० महत्त्वाच्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:28 IST2026-03-06T16:24:08+5:302026-03-06T16:28:51+5:30
Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प मांडला. यात घोषित केलेल्या १० महत्त्वाच्या योजना आणि निर्णयांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना: ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल.

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर : शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी 'महाविस्तार एआय' आणि 'महाराष्ट्र अॅग्रीकल्चर डेटा एक्सेंज' सारखे डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. तसेच चार कृषी विद्यापीठांमध्ये 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्युबेटर सेंटर' स्थापन केले जाईल.

पायाभूत सुविधांचा महाविकास : राज्यात १,२०० किमी मेट्रो मार्ग आणि ६,००० किमीपेक्षा अधिक द्रुतगती महामार्गांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात मुंबई-पुणे जलदगती रेल्वे आणि समृद्धी महामार्गाचे दक्षिण मुंबईशी जोडणी यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे.

महिला सक्षमीकरण आणि लखपती दिदी : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना यापुढेही सुरू राहील. तसेच, राज्यात सध्या २७ लाख लखपती दिदी असून, २०२६-२७ मध्ये आणखी २५ लाख लखपती दिदी तयार करण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे.

नवीन शहरांची निर्मिती (तिसरी आणि चौथी मुंबई) : अटल सेतूच्या माध्यमातून उरण परिसरात 'तिसरी मुंबई' (कर्नाळा, साई, चिरनेर क्षेत्र) आणि वाढवण येथे 'चौथी मुंबई' विकसित करण्यात येणार आहे.

औद्योगिक विकास आणि रोजगार : नवीन गुंतवणूक धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्र स्थापन केले जातील. याद्वारे ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असून, गडचिरोली येथे नवीन 'स्टील हब' विकसित केले जाईल.

आरोग्य सुविधांचा विस्तार : राज्यातील आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी नागपूर येथे 'महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था' स्थापन केली जाईल. तसेच आशियाई विकास बँकेच्या मदतीने ग्रामीण भागासाठी ४,५०० कोटींची 'प्रगती योजना' राबवली जाईल.

पर्यटन आणि वारसा जतन : छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को वारसा यादीतील किल्ल्यांचे संवर्धन, वासोटा किल्ल्यावर रोप-वे आणि रामटेक येथे तिसरी 'चित्रनगरी' विकसित केली जाईल.

शाश्वत ऊर्जा : 'प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज' योजनेत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असून, आता शून्य ते १०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी 'स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासिय रुफटॉप सोलार योजना' मंजूर करण्यात आली आहे.

अजित पवार यांना श्रद्धांजली : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या नावाने 'गतिमान नागरी सेवा पुरस्कार' सुरू केला जाईल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे भव्य स्मारक उभारले जाईल.


















