Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:40 IST2025-08-23T16:35:10+5:302025-08-23T16:40:14+5:30
Ganesh Chaturthi 2025: भाद्रपदातील शुक्ल चतुर्थीपासून(Ganesh Chaturthi 2025) अर्थात २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. एव्हाना घराघरातील गणपती आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असेल यात शंका नाही. बाप्पा वाजत गाजत येऊन मखरात विराजमान झाले आणि प्राणप्रतिष्ठा झाली की सगळी मेहनत सार्थकी लागल्यासारखी वाटते. त्यांनी आणि ज्यांच्या घरी गणपती येत नाही त्यांनीसुद्धा गणेश चतुर्थीला कोणती पथ्य पाळली पाहिजेत ते जाणून घेऊया.

ज्यांच्या घरी गणपती येतो त्यांच्याकडे सोवळे पाळले जाते, परंतु ज्यांच्याकडे गणपती येत नाही, त्यांनी देखील निदान गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पासाठी सोवळे पाळायला हवे, असे शास्त्र सांगते. सोवळे पाळायचे म्हणजे नेमके काय करायचे, हे समजून घेण्यासाठी पुढे दिलेल्या पाच चुका कटाक्षाने टाळा, जेणेकरून घरातले पावित्र्य अबाधित राहील.
गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपल्या सोयीच्या वेळेत न करता दिलेल्या शुभ मुहूर्ताच्या आतच करा. यंदाच्या गणेश चतुर्थीबाबत बोलायचे झाल्यास, मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी सूर्योदयावेळी चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी दुपारी ०१ वाजून ४४ मिनिटांनी समाप्त होत आहे. मध्यान्ह काळी गणपतीची विशेष पूजा करावी, असे जे शास्त्रात सांगितले गेले आहे. ही बाब १९ सप्टेंबर रोजी लागू होते.
आपल्या घरात गणपती बसत नसले, तरी देव्हाऱ्यातल्या गणपतीची यथासांग पूजा करून गूळ, खोबरे किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवा. पूजेसाठी सकाळी वेळेत उठून स्नान आटोपून दाराला आम्रपल्लव लावा. त्यादिवशी अंघोळीचा आळस करू नका. आणि गणपती बाप्पा घरी येणार असले तर सगळ्यांच्या आधी उठून स्नान आटोपून बाप्पाच्या स्वागताला सज्ज राहा.
गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या घरात साग्रसंगीत नैवेद्याचा स्वयंपाक असो वा नसो, कांदा-लसूणाचा वापर टाळा. कांदा लसूण हे उग्र आणि वासना वाढवणारे पदार्थ मानले जातात. उत्सव काळात भक्तिभावे बाप्पाच्या चरणी लीन व्हायचे असेल तर एवढा त्याग तर आपण केलाच पाहिजे.
मांसाहार टाळा. अनेक जण श्रावण संपला म्हणून आनंदाने मांसाहार सुरू करतात, परंतु निदान गणेश चतुर्थीच्या दिवशी सात्विक आहार घेऊन सणाचे पावित्र्य राखा. काही घरांमध्ये गौरीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो, पण शास्त्राचे म्हणाल तर तसा उल्लेख कुठेही केला नाही, त्यामुळे वर्षानुवर्षे चालणारा प्रघात या नावाखाली मांसाहारी नैवेद्य करायचा आणि आपणही तो ग्रहण करायचा हे शास्त्रीय दृष्ट्या योग्य नाही.
बाप्पाची मूर्ती आणखी आकर्षक दिसावी या नादात अलंकार, पुष्पहार घालताना सावधानता बाळगा. मूर्ती नाजूक असते. तिला थोडा जरी धक्का लागला तर ती दुभंगून जाऊ शकते आणि आपल्या हातून मूर्ती भग्न झाल्याची हुरहूर मनाला लागून राहते. म्हणून बाप्पाच्या मूर्तीची सर्वतोपरी काळजी घेत बाप्पाला सही सलामत निरोप द्या. म्हणजे तुम्ही खुश आणि तुमचा पाहुणचार घेऊन बाप्पाही खुश!