परभणीच्या महापौरपदी उद्धवसेनेचे सय्यद इकबाल ३९ मते घेत विजयी! भाजपचा पराभव
By राजन मगरुळकर | Updated: February 12, 2026 12:41 IST2026-02-12T12:38:57+5:302026-02-12T12:41:13+5:30
महापौर पदासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते, मात्र शेवटी भाजपच्या तिरुमला खिल्लारे आणि उद्धवसेनेचे सय्यद इकबाल यांच्यात थेट लढत झाली.

परभणीच्या महापौरपदी उद्धवसेनेचे सय्यद इकबाल ३९ मते घेत विजयी! भाजपचा पराभव
परभणी: परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज झालेला सत्तेचा संघर्ष अखेर महाविकास आघाडीच्या विजयाने संपला आहे. उद्धवसेनेचे सय्यद इकबाल यांनी भाजपच्या उमेदवाराचा १३ मतांनी पराभव करत महापौरपदाची खुर्ची पटकावली आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अनुभवी नगरसेवक गणेश देशमुख यांची निवड निश्चित झाली आहे.
अशी पार पडली मतदान प्रक्रिया, महापौर पदासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते, मात्र ऐनवेळी काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने लढत थेट भाजपचे तिरुमला खिल्लारे आणि उद्धवसेनेचे सय्यद इकबाल यांच्यात झाली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या मतदानात सय्यद इकबाल यांना ३९ मते मिळाली, तर भाजपच्या खिल्लारे यांना २६ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे ( अजित पवार) नगरसेवक अक्षय देशमुख आणि अपक्ष नगरसेवक रजिया बेगम यांनीही उद्धवसेनेच्या बाजूने मतदान केल्याने आघाडीचे पारडे जड झाले.
मध्यरात्री मुंबईहून आले, सकाळी ठरली रणनीती
या निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखण्यात आली होती. उद्धवसेनेचे २५ नगरसेवक मुंबईहून मध्यरात्री परभणीत दाखल झाले होते. पाथरी रोडवरील मोरया लॉन्स येथे काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या ३७ नगरसेवकांची बैठक होऊन सत्तेचा 'फॉर्म्युला' ठरवण्यात आला होता. या बैठकीत ठरल्याप्रमाणे सर्व सदस्यांनी एकजुटीने मतदान केले.
पहिल्यांदा नगरसेवक अन् महापौरपद
सय्यद इकबाल हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले असून, त्यांच्या रूपाने शहराला नवा चेहरा मिळाला आहे. तर तीन वेळा नगरसेवक राहिलेले गणेश देशमुख यांच्या अनुभवाचा फायदा शहराला होणार आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला.