परभणीत मोठे डावपेच; शिंदेसेनेच्या २, काँग्रेस १, भाजप १, जनसुराज्याच्या एका उमेदवाराची माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 18:46 IST2026-01-03T18:45:40+5:302026-01-03T18:46:02+5:30
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप, उद्धवसेना व काँग्रेसने सर्वाधिक बंडखोरांना रिंगणातून बाहेर काढण्यात यश मिळविले.

परभणीत मोठे डावपेच; शिंदेसेनेच्या २, काँग्रेस १, भाजप १, जनसुराज्याच्या एका उमेदवाराची माघार
परभणी : महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विविध पक्षांनी अडचणीच्या उमेदवारांची माघार करून घेण्यात यश मिळविले. यामध्ये काही पक्षीय उमेदवारांनीही माघार घेतली.
शिंदेसेनेच्या तब्बल २ उमेदवारांनी रिंगण सोडले. वाटाघाटीत प्रभाग १२ मध्ये युती झाल्याने भाजपच्या एका उमेदवारालाही रिंगण सोडावे लागले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप, उद्धवसेना व काँग्रेसने सर्वाधिक बंडखोरांना रिंगणातून बाहेर काढण्यात यश मिळविले. काही जण तरीही रिंगणात राहिले आहेत. ते किती परिणाम करतील, हे आगामी काळात कळणार आहे. प्रभाग १ मध्ये मात्र दिशा नितेश देशमुख व आकाश बहिरट या शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. बहुदा काँग्रेसने ही खेळी खेळून डाव साधल्याचे दिसत आहे, तर प्रभाग क्रमांक १२ क मध्ये ऐनवेळी युती झाल्याने भाजपने ॲड. नसरीन पठाण यांना माघार घ्यायला लावली, तर प्रभाग ३ ड मध्ये जनसुराज्यचे फेरोज खान खलंदर खान यांनी माघार घेतली. वंचित बहुजन आघाडीचे संदीप हिवाळे यांनी प्रभाग ६ ड मधून माघार घेतली आहे. १३ ड मधून काँग्रेसच्या रहेमान खान जावेद खान यांनी माघार घेतल्याने आणखी एक प्रभाग आघाडीत आला आहे. काँग्रेसला आणखी एका जागेचा फटका बसला असून, उद्धवसेनेने या प्रभागात दिलेल्या ३ उमेदवारांना हा काँग्रेसचा चौथा उमेदवार मिळाल्याने पॅनल पूर्ण झाले. उद्धवसेनेने टाकलेल्या मोहिनीत काँग्रेस पुरती अडकली असून, आता २७ जागांवरच उरली आहे.
प्रभाग ८ क मधून एमआयएमचे मोहम्मद अब्दुलाहा मोहम्मद इसाहख यांनी माघार घेतली आहे. प्रभाग ९ क मधून यशवंत सेनेच्या नौशाद बी शेख जलाल यांनी माघार घेतली आहे. १५ अ मधून रिपब्लिकन सेनेच्या आशा अहिरे तर १५ ई मधून अमोल कांबळे यांनी माघार घेतली.
शिंदेसेनेने केला भाजपचा गेम
प्रभाग १२ मध्ये युती करणार असल्याचे सांगून भाजपच्या उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडले. मात्र शिंदेसेनेने आपला उमेदवार कायम ठेवून भाजपचा गेम केला आहे. आता भाजपचे २ आणि शिंदेसेनेचे ३ उमेदवार या प्रभागात असल्याने ही कोणती युती असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजपने बंडखोरांची केली मनधरणी
भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरीचे पीक आले होते. यापैकी लक्ष्मीकांत क्षीरसागर, दिनेश नरवाडकर व इतर एक-दोन मात्र त्यांच्या हाती लागले नसल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रवादीनेही बऱ्यापैकी बंडखोर थंड केले, तर काँग्रेससाठीही उद्धवसेनाच बंडखोरांना शांत करण्यासाठी कामाला लागल्याचे दिसून येत होते.