योगी आदित्यनाथ बाहेर जाणारे लोंढे रोखणार; तरुणांना १० लाख नोकऱ्या, मुलींच्या लग्नासाठी १ लाख देणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:42 IST2026-02-11T12:40:37+5:302026-02-11T12:42:24+5:30
UP Budget 2026: उत्तर प्रदेशचे वित्तमंत्री सुरेश खन्ना यांनी ९.१२ लाख कोटींचे बजेट सादर केले. मुलींच्या लग्नासाठी १ लाख रुपये, १० लाख नवीन नोकऱ्या आणि ४० लाख मोफत टॅबलेट्सची मोठी घोषणा. वाचा सविस्तर.

योगी आदित्यनाथ बाहेर जाणारे लोंढे रोखणार; तरुणांना १० लाख नोकऱ्या, मुलींच्या लग्नासाठी १ लाख देणार...
उत्तर प्रदेशचे वित्तमंत्री सुरेश खन्ना यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२६-२७ या वर्षाचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला. ९,१२,६९६ कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी आणि तरुणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. "उत्तर प्रदेश आता 'ॲग्री एक्स्पोर्ट हब' म्हणून जगात ओळखला जाईल," असा विश्वास खन्ना यांनी यावेळी व्यक्त केला.
बजेटमधील महत्त्वाच्या घोषणा:
१. मुलींच्या लग्नासाठी १ लाख रुपये:
योगी सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. आता मुलींच्या लग्नासाठी सरकारकडून १ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. याशिवाय, 'मुख्यमंत्री सुमंगला योजने'चा लाभ आतापर्यंत २६.८१ लाख बालिकांना मिळाल्याचे सरकारने सांगितले.
"यूपीची अर्थव्यवस्था आता ३०.२५ लाख कोटींवर पोहोचली असून बेरोजगारीचा दर केवळ २.२४% वर आला आहे. ६ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत, हे आमच्या विकासनीतीचे यश आहे.", असे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. भारतातील एकूण इलेक्ट्रॉनिक्स घटक बनवणाऱ्या युनिट्सपैकी तब्बल ५५ टक्के युनिट्स एकट्या उत्तर प्रदेशात आहेत. देशात उत्पादित होणाऱ्या एकूण मोबाईल संचांपैकी मोठा हिस्सा यूपीमध्ये तयार होत असून, यामुळे राज्याला 'मॅन्युफॅक्चरिंग पॉवरहाऊस' ही नवी ओळख मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
२. तरुणांसाठी १० लाख रोजगाराच्या संधी:
शिक्षण आणि रोजगाराला जोडण्यासाठी सरकारने १० लाख नवीन नोकऱ्यांची घोषणा केली आहे. तसेच, ४० लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि स्मार्टफोन वाटप करण्यासाठी २,३७४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
३. तंत्रज्ञान आणि AI मिशन:
राज्याला डिजिटल पॉवरहाऊस बनवण्यासाठी 'स्टेट डेटा अथॉरिटी' आणि 'AI मिशन'ची स्थापना केली जाणार आहे. 'टेक युवा-समर्थ युवा' योजनेद्वारे तरुणांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल.
४. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:
उत्तर प्रदेशला कृषी निर्यातीचे केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊस दरात प्रति क्विंटल ३० रुपयांची वाढ करण्याची घोषणा करण्यात आली असून, आतापर्यंत ३.०४ लाख कोटी रुपयांचे विक्रमी ऊस बिल पेमेंट करण्यात आले आहे.
५. आरोग्य क्षेत्रात मोठी झेप:
राज्यातील वैद्यकीय सुविधा बळकट करण्यासाठी MBBS जागा ४,५४० वरून थेट १२,८०० पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत, तर पीजी (PG) जागांमध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे.
