आजपासून निवडणुकीची रणधुमाळी, प्रशासनाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:17 IST2019-04-02T12:23:18+5:302019-04-04T12:17:37+5:30
अधिसुचनेची प्रसिद्धी : प्रशासनाची तयारी पुर्ण, ९ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

आजपासून निवडणुकीची रणधुमाळी, प्रशासनाची तयारी
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या नंदुरबार मतदारसंघासाठी मंगळवार, २ एप्रिल रोजी अधिसुचना प्रसिद्ध होत आहे. याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास देखील सुरुवात होत आहे. यासाठी सर्व प्रशासकीय तयारी पुर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस व भाजप उमेदवार ६ एप्रिल किवा ८ एप्रिल रोजी अर्ज भरण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ११ मार्चपासून लागू झाली आहे. आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसुचना २ एप्रिल रोजी जाहीर होत आहे. याच दिवसापासून उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील.
प्रशासनाची तयारी
निवडणुकीच्या एकुण कामकाजासाठी गेल्या २० दिवसांपासून प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे असतील. तेथेच उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यांच्या दालनाबाहेर तसे फलकही लावण्यात आले आहेत. याशिवाय आचारसंहिता कक्षासाठी अपर जिल्हाधिकारी तर विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय इतरही विविध पथकांची जबाबदारी तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.
अनामत रक्कम साडेबारा हजार
निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करतांना उमेदवारास त्याच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपशील तसेच सांपत्तीक स्थितीची माहितीही सादर करावी लागणार आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ आदिवासी राखीव असल्यामुळे राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी १२,५०० रुपये अनामत रक्कम आणि सोबत जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.