Maharashtra Election 2019: सेनेचे ८६ तर भाजपचे ८३ बंडखोर रिंगणात, मग सत्ता येणार कशी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 21:18 IST2019-10-19T21:11:50+5:302019-10-19T21:18:02+5:30
शरद पवार हे प्रचारासाठी बाहेर पडले तेव्हा भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली़

Maharashtra Election 2019: सेनेचे ८६ तर भाजपचे ८३ बंडखोर रिंगणात, मग सत्ता येणार कशी ?
लोहा : सेनेचे ८६ तर भाजपचे ८३ बंडखोर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ मग सरकार कसे येणार? असा सवाल करीत, सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडले़
लोहा शहरातील बैलबाजार मैदानावर शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीचे दिलीप धोंडगे यांच्या प्रचारानिमित्त सभा घेण्यात आली़ मुंडे म्हणाले, विधानसभेची होत असलेली निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार हे धनदांडगे आहेत. ते तुम्हाला पैसे देऊन मत विकत घेतील, दिलेल्या पैशात ते तुम्हाला पाच वर्षे राबवतील. मात्र या निवडणुकीत धनशक्तीची मस्ती उतरवा़ भाजपची मंडळी रोज उठून शरद पवारांबद्दल बोलतात, मी शरद पवार यांना सांगितले, माझ्या मतदारसंघात मोदी, शहा यांना प्रचारसभा घ्यायला लावतो. माझ्या निवडणुकीचे बघायचे काम नाही, आपण साधे नाहीत. शरद पवार हे प्रचारासाठी बाहेर पडले तेव्हा भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली़ त्यांच्यामागे ईडी लावली, ईडीची भीती दाखवत त्यांची चौकशी लावली. जनतेने निवडणुकीत मोदी, शहा यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. राज्यात परिवर्तन अटळ आहे. सेना-भाजपने कितीही प्रयत्न केलातरी त्यांचे सरकार येणार नाही.
पवार काय कळणार ?
भाजपच्या विरोधकांना ईडीची भीती मोदी आणि शहा दाखवत आहेत. ५५ वर्षे राजकारणात काम केलेले पवार भल्या-भल्यानं कळले नाहीत तुम्ही काय? गुजरातचे मोदी, शहा आपल्या राज्यात येऊन आपल्याला ईडीची भीती दाखविता़ आपण जर गुजरातेत जाऊन मोदी, शहा यांच्या विरोधात बोललो, तर सगळा गुजरात एकवटतो.