Maharashtra Assembly Election 2019: युती सरकारने नागपूरच्या तोंडाला पाने पुसली : आशिष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 23:06 IST2019-10-12T23:02:17+5:302019-10-12T23:06:10+5:30
नागपूरच्या विकासासाठी सरकारने कोणतेही योगदान दिले नाही. या सरकारने नागपूरकरांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका काँग्रेस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी आज केली.

Maharashtra Assembly Election 2019: युती सरकारने नागपूरच्या तोंडाला पाने पुसली : आशिष देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या विकासासाठी सरकारने कोणतेही योगदान दिले नाही. या सरकारने नागपूरकरांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका काँग्रेस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी आज केली.
शनिवारी सकाळी नरेंद्रनगर येथे डॉ. आशिष देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर काढण्यात आलेल्या बाईक रॅलीच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क साधला. यावेळी राकेश पन्नासे, सनद यादव, सागर लोखंडे माहुरे, आशिष बालपांडे, गौतम गाणार व इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.
मिहान, सेझ, एमआयडीसी, मोठ्या कंपन्या, उद्योगामध्ये मोठ्या गुंतवणुकीसाठी मोठा रोजगार अशा आश्वासनाची खैरात वाटून २०१४ मध्ये भाजपने सत्ता बळकावली. खोट्या आश्वासनामुळेच नागपूरच्या अधोगतीला सुरुवात भाजपने विकासापेक्षा जुमलेबाजी जास्त केली. सबका साथ सबका विकास म्हणत सगळ्यांच्या तोंडचे घास हिरावून घेतले. बेरोजगारी महागाई, महिला असुरक्षितता अशा अनेक प्रश्नांनी नागपूरकर हैराण आहेत. बेरोजगारी ही प्रत्येक घरातील गंभीर समस्या आहे. इच्छा नसताना वृद्ध आईवडिलांना एकटे सोडून नोकरीसाठी नागपूरबाहेर गेलेल्या युवक-युवतींची संख्या जास्त आहे.
नागपूर व विदर्भाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणारा मिहान प्रकल्प मागे पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना रोजगारासाठी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा प्रश्न विचारून ते म्हणाले, उद्योगधंदे नाहीत म्हणून रोजगार नाही. नोकरीअभावी युवकांचे लग्नाचे वय निघून जात आहे. त्यांच्यात नैराश्य पसरले आहे. अजून काय काय धिंडवडे काढायचे आहेत भाजपला नागपूरकरांचे, असा सवाल त्यांनी केला.
नागपूरकरांनी आता परिवर्तन करावे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. सतेचा गैरवापर करणाऱ्या, सामान्यांवर महागाईचे ओझे टाकणाऱ्या, सामान्य मतदारांना गृहित धरून व त्यांना भावनिक आवाहन करून त्यांची मते लाटून स्वत:ची पोळी शेकणाऱ्यांना ओळखा, असे आवाहनही त्यांनी केले.