स्वीकृत सदस्यपदी पराभूत नकोच ! उमेदवारी न मिळालेले भाजप व काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 16:58 IST2026-01-20T16:57:09+5:302026-01-20T16:58:15+5:30
Nagpur : महापालिका निवडणुकीत भाजप व काँग्रेसचे जे उमेदवार पराभूत झाले आहेत, त्यांना स्वीकृत नगरसेवक करू नका, अशी जोरदार मागणी दोन्ही पक्षात उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहेत.

Don't lose out on the accepted member post! BJP and Congress workers who didn't get the nomination are aggressive
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निवडणुकीत भाजप व काँग्रेसचे जे उमेदवार पराभूत झाले आहेत, त्यांना स्वीकृत नगरसेवक करू नका, अशी जोरदार मागणी दोन्ही पक्षात उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहेत.
भाजप व काँग्रेस पक्षात पराभूत झालेल्या उमेदवारांनी आता स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. यामुळे उमेदवारी न मिळालेल्यांनी पक्ष वाढवायचा असेल, तर नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी भूमिका घेतली आहे.
नागपूर महापालिकेत १५१ जागांच्या पक्षीय बलानुसार १० स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. त्यात भाजपचे ७, काँग्रेसचे २ स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. या स्वीकृत नगरसेवकपदाच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन होणार आहे. तसेच पक्षीय बलाबलानुसार स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती केली जाते.
दहावा सदस्य कुणाचा?
भाजपचे ७ व काँग्रेसचे दोन स्वीकृत सदस्य झाल्यानंतर तिसरा सदस्य कुणाचा होणार याची उत्सुकता आहे. मनपात एमआयएमचे ६, मुस्लीम लीग ४, उद्धवसेना २, राष्ट्रवादी (अजित पवार) १, बसपचा एक सदस्य आहे. या सदस्यांचा निर्णय यात महत्त्वाचा ठरणार आहे.
अशी ठरते स्वीकृत सदस्यसंख्या
२०२३ ला राज्य सरकारने या आदेशात बदल केला. त्यानुसार नागपूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या दहा झाली. १५ नगरसेवकांपाठीमागे १ स्वीकृत नगरसेवक असेल. यानुसार भाजपचे ७ व काँग्रेसचे २ स्वीकृत नगरसेवक असेल. यातही भाजपला सातव्या सदस्यांसाठी तीन सदस्यांची गरज भासणार आहे. शिंदेसेनेना, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी मदत केली तरी एक सदस्य लागणार आहेत.
स्थायी समितीसाठीही मोर्चेबांधणी
महापालिकेतील 'स्थायी' ही अत्यंत महत्त्वाची समिती आहे. या समितीमधूनच सर्व आर्थिक बाबींचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे या समितीवर वर्चस्व असणाऱ्यांचा महापालिकेत बोलबाला असतो. मनपाचा कारभार खऱ्या अर्थाने ही समिती हाकत असते. स्थायी समितीमधील सदस्यांची एकूण संख्या १६ आहे. त्यानुसार पक्षीय बलाबलाचा विचार करून स्थायी समिती सदस्यांची निवड केली जाते. १६ सदस्यांच्या समितीमध्ये भाजपचे ११ व काँग्रेसचे ३ सदस्य गेल्यानंतर काँग्रेसकडे चार मते शिल्लक राहतील. त्यामुळे उर्वरित दोन सदस्यांच्या निवडीसाठी चुरस राहणार आहे.