पावसाळ्यापूर्वी घरे रिकामी करा ! धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती: एकाच वेळी बांधकामासाठी प्रशासनाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:46 IST2026-04-15T13:46:19+5:302026-04-15T13:46:38+5:30
Mumbai News: धारावीमधील गणेशनगर-मेघवाडी, एसव्हीपी नगर, आझाद नगर अ व ब, आझाद नगर क तसेच कमला रमण नगर या भागांतील रहिवाशांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापूर्वी आपली घरे रिकामी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळ्यापूर्वी घरे रिकामी करा ! धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती: एकाच वेळी बांधकामासाठी प्रशासनाचे आवाहन
मुंबई - धारावीमधील गणेशनगर-मेघवाडी, एसव्हीपी नगर, आझाद नगर अ व ब, आझाद नगर क तसेच कमला रमण नगर या भागांतील रहिवाशांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापूर्वी आपली घरे रिकामी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) अंतर्गत माटुंगा रेल्वे परिसरातील सेक्टर-६ मध्ये पुनर्वसन इमारतींच्या बांधकामास प्रारंभ करण्याच्या दृष्टीने संबंधित रहिवाशांना सहकार्याचे आवाहन करणारी सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केली आहे.
लाखो धारावीवासीयांसाठी ‘की-टू-की’ पुनर्वसन घरे उभारण्यासाठी या परिसराचे स्थलांतर आवश्यक आहे. असल्याने रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आवाहन आहे. रहिवाशांनी वेळेत सहकार्य केल्यास पुनर्वसन प्रकल्पाचे बांधकाम विलंब न होता सुरू होईल. परिसरातील नागरिकांना होणारी गैरसोय टाळता येईल. लवकर स्थलांतर केल्यास एकाचवेळी विविध ठिकाणी बांधकाम सुरू करता येईल. पुनर्वसन घरे लवकर उपलब्ध करून देता येतील, असे प्रकल्पाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
धारावातील २८० कुटुंबांचे संक्रमण शिबिरात स्थलांतर
धारावी पुनर्विकास प्रक्रियेला आता वेग येऊ लागला असून, अंतिम परिशिष्ट-२ यादी जाहीर केल्या जात आहेत. रहिवासी संक्रमण (ट्रान्झिट) घरांमध्ये किंवा भाड्याच्या निवासस्थानी स्थलांतरित होत आहेत. आतापर्यंत सुमारे २८० कुटुंबांनी ‘म्हाडा’च्या संक्रमण शिबिरातील घरांमध्ये स्थलांतर केले आहे.
‘एनएमडीपीएल’कडून रहिवाशांना उंच इमारतीतील नव्या जीवनशैलीशी जुळवून घेण्यासाठी मार्गदर्शन सुरू करण्यात आले आहे. या प्रक्रियेत रहिवाशांशी संवाद साधण्यासाठी पथनाट्ये आणि पोस्टर मोहीम अशा सर्जनशील उपक्रमांचा वापर केला जात आहे.
लिफ्टचा सुरक्षित व जबाबदारीने वापर, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, सार्वजनिक जागांची स्वच्छता राखणे यांबाबत मार्गदर्शन दिले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासारख्या अस्वच्छ सवयींपासून दूर राहण्यावरही विशेष भर देण्यात येत असून, स्वच्छ व सुसंस्कृत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
पुनर्विकास प्रकल्पाच्या माहितीनुसार...
माटुंगा येथील रेल्वे जमीन धारावी अधिसूचित क्षेत्रात (डीएनए) समाविष्ट करताना ती मोकळी जमीन असल्याचे गृहीत धरले होते. मात्र या जमिनीवर झोपडपट्टीधारक वास्तव्यास असल्याने बांधकाम सुरू करण्यासाठी त्यांचे स्थलांतर अपरिहार्य आहे.
रहिवाशांना लाभ काय?
स्थलांतर प्रक्रियेसाठी रहिवाशांना तात्पुरत्या निवासस्थानीराहण्याचा
किंवा भाड्याच्या घरात स्थलांतर करण्याचा पर्याय आहे.
स्थलांतरासाठी एकरकमी पाच हजार रुपये अनुदान आहे.
भाड्याने राहण्याचा पर्याय स्वीकारणाऱ्या पात्र रहिवाशांना कायमस्वरूपी घर मिळेपर्यंत दरवर्षी ५ टक्के वाढीसह भाडे अनुदान दिले जाईल.
रहिवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्य केंद्र आहे.
केंद्रांच्या माध्यमातून भाडे धोरण, कागदपत्रे आणि तक्रार निवारणाबाबत माहिती मिळू शकते.
महिलांना घरात प्रशस्त हॉल आणि स्वयंपाकघर अपेक्षित असते. येथे आम्हाला ते मिळत आहे. संक्रमण शिबिरातील घरात आल्यानंतर बरे वाटत आहे. परिसर स्वच्छ आहे आणि व्यवस्थापन समिती उत्तम काम करत आहे.
- राजश्री शिर्के, रहिवासी, धारावी
आमच्याकडे पूर्वी कोणत्याही सुविधा नव्हत्या; पण येथे नियमित पाणीपुरवठा, स्वतंत्र शौचालय यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
- मीना बालमोर