रॅम्पमध्ये बिघाड! मुंबई-मांडवा ‘रो-रो’ रद्द; सुट्ट्यांच्या हंगामात प्रवाशांचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 06:21 IST2026-04-29T06:20:58+5:302026-04-29T06:21:26+5:30
या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अलिबाग, मांडव्याकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले

रॅम्पमध्ये बिघाड! मुंबई-मांडवा ‘रो-रो’ रद्द; सुट्ट्यांच्या हंगामात प्रवाशांचा खोळंबा
मुंबई - मुंबई ते मांडवा दरम्यान धावणारी ‘एमटूएम’ची रो-रो फेरी मंगळवारी तांत्रिक बिघाडामुळे अचानक रद्द करावी लागली. बोटीच्या रॅम्पमध्ये बिघाड झाल्याने आत उभी केलेली वाहने प्रवाशांना पुन्हा बाहेर काढावी लागली. ऐन पर्यटन हंगामात फेरी रद्द झाल्याने प्रवाशांचे नियोजन कोलमडले आणि त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
दररोज सकाळी ८ वाजता सुटणाऱ्या या फेरीसाठी मंगळवारी प्रवाशांनी नियोजित वेळेत वाहनांसह जहाजात प्रवेश केला होता. मात्र, फेरी सुटण्याची वेळ टळून गेल्यानंतरही प्रवास सुरू झाला नाही. सुरुवातीला प्रवाशांना या विलंबाचे कारण स्पष्ट करण्यात आले नव्हते. अखेर, वाहने चढविण्या-उतरविण्याच्या रॅम्पमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तातडीने दुरुस्ती शक्य न झाल्याने सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास फेरी रद्द केल्याची घोषणा करण्यात आली.
या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अलिबाग, मांडव्याकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले. काहींना नाइलाजाने रस्तेमार्गे प्रवास करावा लागल्याने त्यांच्या वेळेचा आणि पैशांचा अतिरिक्त अपव्यय झाला. सुट्ट्यांच्या हंगामातच हा प्रकार घडल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तिकिटांचा परतावा मिळणार
फेरी रद्द झाल्यामुळे सर्व प्रवाशांना त्यांच्या तिकिटाची संपूर्ण रक्कम परत केली जाईल, अशी घोषणा ‘एमटूएम’ व्यवस्थापनाने केली आहे. ई-मेलद्वारे परताव्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, व्यवस्थापनाने या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, रॅम्पच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, बुधवारी ही सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.