“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 17:24 IST2026-04-30T17:23:27+5:302026-04-30T17:24:36+5:30
Deputy CM Eknath Shinde: पुढील वाटचाल पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच असेल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Deputy CM Eknath Shinde: बच्चू कडू यांची ओळख ही आंदोलनातून उभी राहिलेली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी काढलेले मोर्चे, दिव्यांगांसाठी उभारलेले आंदोलन, तसेच गोरगरीब, शोषित आणि पीडित घटकांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढा देत त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली. बच्चू कडू यांच्या आंदोलनांमुळे सरकारला कर्जमाफीसारखे महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले, असे शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
आंदोलन करणाऱ्यांना सत्तेबाहेर ठेवण्याची परंपरा मोडीत काढत एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना शिवसेनेत घेत थेट विधान परिषदेची उमेदवारी देत, रस्त्यावरचा आवाज थेट निर्णयप्रक्रियेत आणण्याचा नवा राजकीय प्रयोग केल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंच्या लढाऊ स्वभावाचे कौतुक करत अन्यायाविरुद्ध लढा हा बाळासाहेबांच्या विचारांचा गाभा असल्याचे सांगितले. आपले आणि बच्चू कडू यांचे विचार एकच आहेत, ते म्हणजे सर्वसामान्यांना न्याय देणे, असे स्पष्ट करत, सामाजिक लढ्याला राजकीय ताकदीची जोड देण्याची गरज अधोरेखित केली. मी एकदा शब्द दिला की तो पाळतो, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल
प्रहार संघटना स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून कायम राहणार असली तरी ती शिवसेनेशी संलग्न राहील. त्यामुळे रस्त्यावरची ताकद आणि सत्तेची ताकद एकत्र येऊन सामाजिक प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असे चित्र निर्माण झाले आहे. बच्चू कडूंनीही हा प्रवेश केवळ उमेदवारीसाठी नसून विचारांच्या एकतेसाठी असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रहार संघटना पुढेही स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहणार असली तरी राजकीय लढा शिवसेनेच्या माध्यमातून उभारला जाईल. शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, दलित, शोषित आणि गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी हा निर्णय घेतला. पुढील वाटचाल पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच असेल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.