Mumbai: चौपाट्यांवर १२४ जीवरक्षकांचा ‘वॉच’, पालिकेकडून १२४ जीवरक्षकांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:57 IST2026-04-21T12:55:22+5:302026-04-21T12:57:39+5:30
पर्यटकांची संख्या वाढल्याने सहा किनाऱ्यांवर गस्त वाढविली: पालिकेकडून तीन वर्षांसाठी नियुक्त्या

Mumbai: चौपाट्यांवर १२४ जीवरक्षकांचा ‘वॉच’, पालिकेकडून १२४ जीवरक्षकांची नियुक्ती
सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: शहरातील सहा प्रमुख चौपाट्यांवर पर्यटकांची संख्या वाढत असल्याने आता या ठिकाणी १२४ जीवरक्षकांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने गस्त आणि आपत्कालीन किंवा अडचणीच्या प्रसंगात मदत करण्यासाठी तैनात असलेल्या या जीवरक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
समुद्रकिनाऱ्यांवर फेसाळत्या पाण्यात जाऊन सेल्फी काढण्याच्या वेडापायी अनेक पर्यटक जीव धोक्यात घालतात. गणेशोत्सव आणि अन्य सण-उत्सवांच्या वेळी चौपाट्यांवर मोठी गर्दी होते. त्यादृष्टीने चौपाट्यांवर अधिक कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी पालिकेने पावले टाकली आहेत. त्याकरिता जुहू, वर्सोवा, अक्सा, गोराई, गिरगाव, दादर या सहा चौपाट्यांवरील जीव रक्षकांची संख्या ९३ वरून १२४ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ते दोन
पाळ्यांमध्ये गस्त घालतील
चौपाट्यांवर पालिकेकडून जीवरक्षक तैनात करण्यात आले असले, तरी अनेकदा अतिउत्साही पर्यटकांमुळे जीवितहानी किंवा दुर्घटना घडतात. याआधी पालिकेकडून १३ कोटी खर्च करून ९३ तंत्रकुशल जीवरक्षकांची नेमणूक केली होती. मात्र आता त्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
...तर कंत्राटदाराला दंड
चौपाट्यांवरील सुरक्षिततेबाबत पालिका अधिक जागरूक राहणार असून तेथे कोणतीही प्राथमिक मदत व्यवस्था किंवा जीवरक्षक उपलब्ध नसल्यास संबंधित कंपनी किंवा कंत्राटदाराला दंड आकारण्यात येणार आहे. जीवरक्षक अनुपस्थित राहिल्यास प्रत्येक पाळीसाठी दोन हजार रुपये, तर मदतीसाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध नसल्यास प्रत्येक पाळीसाठी २५० रुपये दंड होईल.
आधुनिक साधनांसह बचाव करणार
- कंत्राटदारावर केवळ मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी नसून सर्व सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून देणेही बंधनकारक आहे. यामध्ये लाइफ जॅकेट, रिंग ब्यूई, सर्फ बोर्ड, रेस्क्यू ट्यूब, स्पाइन बोर्ड, ऑक्सिजन सिलिंडर, वॉकी-टॉकी, प्रथमोपचार पेटी, मेगाफोन, टॉर्च, ध्वज आदींचा समावेश आहे.
-या जीवरक्षकांकडून नियमित गस्त, नागरिकांना धोकादायक भागांबाबत सूचना देणे, बुडणाऱ्यांना वाचवणे, प्राथमिक उपचार व सीपीआर देणे आणि आवश्यक असल्यास रुग्णालयात हलविणे, ही कामे अपेक्षित आहेत.
- जीवरक्षकांसाठी किमान शारीरिक व शैक्षणिक पात्रताही निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षे, किमान दहावी उत्तीर्ण असणे, त्याला मराठी बोलता येणे आणि सरकारी मान्यताप्राप्त संस्थेचे जीवरक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच ५० टक्के जीवरक्षक हे कोळी समाजातून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सणासुदीत २५ टक्के अतिरिक्त मनुष्यबळ
- दररोज सकाळी ७:३० ते रात्री ११ वाजेपर्यंत चौपाट्यांवर देखरेख ठेवली जाणार आहे. जीवरक्षक दोन शिफ्टमध्ये काम करणार असून पहिली शिफ्ट सकाळी ७:३० ते दुपारी ३:३० आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते रात्री ११ अशी असेल.
- प्रत्येक शिफ्टमध्ये संबंधित बीचवर किमान ८ जीवरक्षकांची नेमणूक बंधनकारक ठेवण्यात आली आहे. याशिवाय गणेश विसर्जन, दहीहंडी, होळी, रमजान ईद, नववर्ष साजरे होणे आदी विशेष प्रसंगी २५ टक्के अतिरिक्त जीवरक्षकांची तरतूद आहे. या विशेष दिवसांसाठी १६० अतिरिक्त शिफ्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.