दुर्धर आजारांवर आता मिळणार घरपोच उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:18 IST2026-04-18T13:14:46+5:302026-04-18T13:18:37+5:30
Health News: कर्करोग, हृदयरोग, वृद्धापकाळाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत असताना, सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘राज्य पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम’ (उपशमन काळजी) अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत आता ‘आरोग्यवर्धिनी केंद्रां’मार्फत गावागावात आणि थेट रुग्णांच्या घरी जाऊन सेवा पुरवली जाणार आहे.

दुर्धर आजारांवर आता मिळणार घरपोच उपचार
मुंबई - कर्करोग, हृदयरोग, वृद्धापकाळाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत असताना, सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘राज्य पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम’ (उपशमन काळजी) अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत आता ‘आरोग्यवर्धिनी केंद्रां’मार्फत गावागावात आणि थेट रुग्णांच्या घरी जाऊन सेवा पुरवली जाणार आहे.
‘पॅलिएटिव्ह केअर’ म्हणजे बऱ्या न होणाऱ्या किंवा दीर्घकालीन गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी दिली जाणारी विशेष वैद्यकीय व मानसिक काळजी. यात रुग्णाच्या जीवनमानात सुधारणा करणे, वेदना व ताण कमी करणे यावर भर दिला जातो. सर्व जिल्ह्यांत हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने विस्तारला जाणार आहे. गंभीर व अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी डॉक्टर व नर्स घरी भेट देऊन उपचार करतील. यामुळे रुग्णांना रुग्णालयात जाण्याचा त्रास कमी होणार आहे. ‘आरोग्यवर्धिनी केंद्रे’ या सेवेसाठी मुख्य केंद्रबिंदू असतील. येथे रुग्णांची नोंदणी, तपासणी आणि पुढील उपचारांचे नियोजन केले जाईल. रुग्णांना मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ‘होम केअर किट’मध्ये ड्रेसिंग साहित्य, वेदनाशामक औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा समावेश असेल. जिल्हा रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांत पॅलिएटिव्ह केअरसाठी विशेष खाटा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. राज्यात हजारो रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून घरपोच सेवा देण्यात आली आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळत आहे.
प्रशिक्षित पथकांद्वारे सेवा
रुग्णांना वेदनाशामक उपचार, मानसिक आधार आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्यास मदत होईल. यामुळे ग्रामीण व शहरी भागात रुग्णांना रुग्णालयात वारंवार जाण्याची गरज कमी होणार असून, उपचार घरीच उपलब्ध होतील. यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, नर्स आणि डॉक्टरांची पथके कार्यरत राहतील.
रुग्णांना जगण्याचा अधिकार देणारा विशेष उपक्रम
पॅलिएटिव्ह केअर हा केवळ उपचार नसून रुग्णाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा उपक्रम आहे. राज्यात या सेवांचा विस्तार करून प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. २०१२ मध्ये इगतपुरी, पालघरमधील जव्हारमधून प्रारंभ झाला.