मुंबईत उभारणार 'बिहार भवन'! ३० मजल्यांची इमारत, अद्ययावत सोयी-सुविधा; तब्बल ३१४ कोटींच्या खर्चाला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:17 IST2026-01-19T13:50:40+5:302026-01-19T14:17:39+5:30
Bihar Bhavan News: बिहार सरकारने दिल्लीनंतर आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्येही बिहार भवन उभारण्याची घोषणा केली आहे. मात्र या बिहार भवनाच्या बांधणीला आतापासून विरोध होऊ लागला असून, आम्ही मुंबईमध्ये बिहार भवन बांधू देणार नाही, असा इशारा मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिला आहे.

मुंबईत उभारणार 'बिहार भवन'! ३० मजल्यांची इमारत, अद्ययावत सोयी-सुविधा; तब्बल ३१४ कोटींच्या खर्चाला मंजुरी
बिहार सरकारने दिल्लीनंतर आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्येहीबिहार भवन उभारण्याची घोषणा केली आहे. बिहारच्या गृहनिर्माण विभागाचे सचिव कुमार रवी यांनी याबाबत माहिती देताना मुंबईमधील एलिफिस्टन इस्टेट, मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात हे बिहार भवन उभे राहणार असून, राज्य मंत्रिमंडळाने त्यासाठी ३१४ कोटी २० लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मान्यता दिली आहे, असे सांगितले. मात्र या बिहार भवनाच्या बांधणीला आतापासून विरोध होऊ लागला असून, आम्ही मुंबईमध्ये बिहार भवन बांधू देणार नाही, असा इशारा मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिला आहे.
प्रस्तावित बिहार भवन हे बेसमेंटसह सुमारे ३० मजली असणार आहे. तसेच त्यामध्ये आधुनिक सोईसुविधाही असणार आहेत. याची उंची जमिनीपासून ६९ मीटर असेल. या इमारतीमध्ये १७८ खोल्या असतील. त्यांचा वापर सरकारी अधिकारी, पाहुणे आणि गरजू लोकांसाठी केला जाईल.
तसेच या बिहार भवनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या इमारतीमध्ये बिहारमधून मुंबईमध्ये उपचारांसाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाईल. कर्करोगासह इथर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी २४० बेड क्षमता असलेलं वसतीगृह या इमारतीत असेल. त्यामाध्यमातून अशा गरजू व्यक्तींना सुरक्षित आणि सुलभ निवासस्थान मिळेल.
मात्र बिहार सरकारकडून घोषणा करण्यात आलेल्या या बिहार भवनाच्या बांधणीस मनसेने विरोध केला आहे. या बिहार भवनाबाबत विचारले असता मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार म्हणाले की, बिहार भवन वगैरे आम्ही इथे बनवू देणार नाही. महाराष्ट्रात एवढ्या समस्या आहेत, शेतकऱ्यांवर संकट आहे, विद्यार्थ्यांचं शिक्षण महाग झालं आहे, अशा परिस्थितीत ३१४ कोटी रुपये खर्चू बिहार भवन बांधलं जाणार आहे. बिहारमधून येणाऱ्या रुग्णांसाठी या इमारतीत सुविधा असेल असं सांगितलं जातंत. मग हीच रक्कम खर्च करून बिहारमध्येच का मोठं रुग्णालय बांधत नाही? असा सवालही यशवंत किल्लेदार यांनी विचारला आहे.