जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 07:25 IST2026-04-29T07:22:29+5:302026-04-29T07:25:49+5:30
आदिवासी पाड्यांमधील नागरिकही जांभळांची विक्री करण्यासाठी नवी मुंबईत येत असतात. आवक कमी असल्यामुळे दर तेजीत असून मेअखेरपर्यंत दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
नवी मुंबई - मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी असलेल्या आणि सर्वच मुंबईकरांना उत्सुकता लागून राहिलेल्या जांभळांची आवक सुरू झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी दीड टन आवक झाली. घाऊक बाजारात ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो व किरकोळमध्ये ५०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. दर जास्त असूनही खरेदीसाठी ग्राहकांची पसंती मिळत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षभर सर्वांत कमी आवक होणाऱ्या; पण ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या फळांमध्ये जांभळाचा समावेश आहे.
मधुमेहाच्या रुग्णांच्या आरोग्यासाठी जांभळाचे फळ वरदान समजले जाते. नागरिक फळ खाऊन त्याच्या बिया साठवून ठेवतात. या बियांचे चूर्ण करून त्याचा वर्षभर उपयोग केला जातो. यामुळेच जांभळाच्या हंगामाची आतुरतेने वाट पाहिली जाते. मुंबईत बदलापूर व कोकणातून त्यांची आवक सुरू झाली आहे.
आदिवासी पाड्यांमधील नागरिकही जांभळांची विक्री करण्यासाठी नवी मुंबईत येत असतात. आवक कमी असल्यामुळे दर तेजीत असून मेअखेरपर्यंत दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
पचनक्रिया सुधारते...
जांभळाला मधुमेह रुग्णांकडून मोठी मागणी असते. यामधील जॅम्बोलिन व अँटीमेलिन घटक रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. पचनक्रिया सुधारण्यास व हाडे मजबूत करण्यासाठीही लाभदायक असतात. जांभळाच्या बियांचे चूर्ण करून मधुमेह झालेले रुग्ण त्याचे वर्षभर सेवन करत असतात.
एक लिंबू दहा रुपयांत, खराब हवामानामुळे उत्पादन घटल्याने बाजारावर परिणाम
उन्हाचा पारा जसजसा वाढू लागला आहे, तसतशी बाजारात लिंबाची मागणीही वाढली आहे. मात्र, खराब हवामानामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने लिंबाचे भाव चांगलेच कडाडले आहेत. सध्या घाऊक बाजारात लिंबाला प्रतिकिलो ३० ते १६० रुपयांचा दर मिळत असून, किरकोळ बाजारात एका लिंबासाठी चक्क १० रुपये मोजावे लागत आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंध्र प्रदेशमधून लिंबाची आवक सुरू असून मंगळवारी २३ टन ते विक्रीसाठी आले. असून येथून अहमदाबाद व दिल्लीलाही लिंबू पाठविण्यात आले आहे. यंदा खराब हवामानामुळे लिंबाचे उत्पादन कमी झाले आहे. सद्य:स्थितीमध्ये आंध्र प्रदेशमधून लिंबाची आवक सुरू असून १५ मेपासून कर्नाटकमधून आवक वाढेल. मुंबईमधून अहमदाबाद व दिल्लीलाही ते पाठविले जात आहे, असे लिंबाचे व्यापारी गौरव केशरवानी यांनी सांगितले.